पंतला खेळ बदलायला सांगितलेलं नाही!

पंतला खेळ बदलायला सांगितलेलं नाही!

भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. आयपीएल २०२६ मध्येही त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा झाल्या नाहीत. तरीही अफगाणिस्तानविरुद्ध ६ जूनपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पंतबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत त्याला आपला नैसर्गिक खेळ बदलण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाले, “प्रत्येक खेळाडूचे मूल्यमापन त्याच्या कामगिरीच्या आधारावर केले जाते. ऋषभ पंतबाबत बोलायचे झाल्यास, आम्हाला तो जसा खेळतो तसाच खेळताना पाहायचा आहे. आम्ही त्याला त्याची शैली बदलण्यास सांगितलेले नाही.”

मात्र, त्याचवेळी गंभीर यांनी पंतला एक महत्त्वाचा सल्लाही दिला. त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ आक्रमक फलंदाजी पुरेशी नसते, तर सामन्याची परिस्थिती ओळखून खेळणेही तितकेच महत्त्वाचे असते.

“परिस्थिती समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्या क्षणी संघाला तुमच्याकडून नेमकी कोणती खेळी अपेक्षित आहे, हे ओळखले पाहिजे. त्यानुसार फटके निवडले पाहिजेत. परिस्थितीनुसार खेळणे हीच मोठ्या खेळाडूची खूण असते,” असे गंभीर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “कोणत्याही खेळाडूला त्याच्या नैसर्गिक शैलीपासून पूर्णपणे दूर जाऊन वेगळा खेळ करण्यास सांगितलेले नाही. कसोटी, एकदिवसीय किंवा टी-२० कोणताही फॉरमॅट असो, धावा करणे आणि विकेट्स घेणे हेच अंतिम उद्दिष्ट असते. मात्र त्या धावा कशा करायच्या, हे परिस्थितीवर अवलंबून असते.”

पंतसमोर पुनरागमनाची मोठी संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतची कामगिरी निराशाजनक ठरली होती. मात्र इंग्लंड दौऱ्यावर त्याने दमदार खेळ दाखवला होता. दुर्दैवाने दुखापतीमुळे त्याला मालिका अर्धवट सोडावी लागली होती.

आता अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत पंतकडे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हा सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना ठरणार आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाचा विश्वास कायम असताना, पंत आपल्या कारकिर्दीतील या महत्त्वाच्या टप्प्यावर मोठी खेळी साकारतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version