टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बांगलादेश जवळपास बाहेर पडला आहे. सुरक्षेचं कारण देत बांगलादेश सरकारने गुरुवारी भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आपला संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला. आयसीसी कधीही आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचं नाव सहभागी देश म्हणून जाहीर करू शकते.
या निर्णयामुळे बांगलादेशच्या क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारने हा निर्णय घेताना आमच्याशी सल्लामसलतच केली नाही, अशी भावना अनेक खेळाडूंनी व्यक्त केली आहे.
एका रिपोर्टनुसार, खेळाडू जास्त रागावले आहेत तो निर्णयापेक्षा तो ज्या पद्धतीने घेण्यात आला त्यावर. संवादाऐवजी “वरून आदेश” अशी संस्कृती वापरली गेली. खेळाडूंना असं वाटलं की आम्ही चर्चेचा भाग नाही, तर आधीच ठरवलेल्या पटकथेचे फक्त प्रेक्षक आहोत.
वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय होण्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) खेळाडूंची एक बैठक बोलावली होती.
एका क्रिकेटपटूने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं,
“ही मीटिंग आमचं मत जाणून घेण्यासाठी नव्हती. आम्हाला फक्त काय होणार आहे ते सांगण्यासाठी बोलावलं होतं. निर्णय आधीच झाला होता आणि आमचं काहीही म्हणणं त्यावर परिणाम करणार नव्हतं. आधी खेळाडूंची मोकळेपणाने मतं घेतली जायची, पण यावेळी सरळ सांगण्यात आलं की भारतात वर्ल्ड कप खेळण्याचा प्रश्नच नाही.”
त्या खेळाडूच्या मते, या सगळ्यात सरकारचा थेट हस्तक्षेप आहे.
“सरकारचा कॉल आधीच आला होता. सरळ आदेश होता – संघ जाणार नाही. आता हा विषय क्रिकेटच्या लॉजिकच्या पलीकडे गेला असून तो सुरक्षा आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत अडकला आहे,” असं तो म्हणाला.
रिपोर्टनुसार, मीटिंगमध्ये कर्णधार लिटन दास आणि कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी स्पष्ट सांगितलं की संघ पूर्णपणे तयार आहे आणि स्पर्धा खेळण्यास इच्छुक आहे.
“गेल्या काही महिन्यांत आम्ही एक मजबूत टी-२० संघ तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचे चांगले निकालही दिसले आहेत,” असं त्यांनी म्हटलं.
एका दुसऱ्या क्रिकेटपटूने सांगितलं,
“आपण गेलो नाही, तर नुकसान आपल्या क्रिकेटचंच होणार आहे. आम्ही इतकी मेहनत केली, पण त्याचा काहीच उपयोग राहणार नाही.”
मीटिंगनंतर क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की बांगलादेश आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यांनी आयसीसीवर “योग्य न्याय न दिल्याचा” आरोप केला.
त्यांचं म्हणणं होतं की ना आयसीसीने, ना भारत सरकारने बांगलादेशच्या सुरक्षेच्या चिंतेवर ठोस पावलं उचलली. आधी मिळालेल्या धमक्या, प्रेक्षक आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता संपूर्ण स्पर्धाच धोकादायक असल्याचं सरकार आणि बीसीबी अधिकाऱ्यांचं मत आहे.
बीसीबी अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी खेळाडूंना समजावण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांश खेळाडूंना आधीपासूनच वाटत होतं की निकाल ठरलेलाच आहे.
संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने सांगितलं,
“या मोठ्या स्पर्धेसाठी ज्यांनी स्वतःला पूर्ण झोकून दिलं, त्या खेळाडूंकरता वाईट वाटतंय.”







