भारताची पुन्हा फलंदाजीत घसरगुंडी; इंग्लंडचा ऐतिहासिक मालिका विजय

भारताची पुन्हा फलंदाजीत घसरगुंडी; इंग्लंडचा ऐतिहासिक मालिका विजय

भारतीय फलंदाजांच्या पुन्हा एकदा झालेल्या निराशाजनक कामगिरीचा फटका संघाला बसला. इंग्लंडने चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा ९ विकेट्सने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे, भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका जिंकण्याची इंग्लंडची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरली.

यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ६ द्विपक्षीय टी-२० मालिकांपैकी ५ मालिका भारताने जिंकल्या होत्या, तर १ मालिका बरोबरीत सुटली होती. आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारताला आता इंग्लंडकडूनही पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग दोन द्विपक्षीय टी-२० मालिका गमावण्याची वेळ भारतावर याआधी २०१९ मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आली होती.

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. निर्धारित २० षटकांत ७ बाद १५८ धावाच भारताला करता आल्या. कर्णधार श्रेयस अय्यर याने ४९ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी करत संघाला सावरले. मात्र, इतर फलंदाजांनी त्याला अपेक्षित साथ दिली नाही.

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने १५ धावा केल्या. अभिषेक शर्मा १६ धावांवर, ईशान किशन अवघ्या ४ धावांवर बाद झाला. शिवम दुबेने २३ चेंडूत २२ धावा, तिलक वर्माने ११ धावा, वॉशिंग्टन सुंदरने ५ धावा, तर अक्षर पटेलने केवळ १ धाव केली.

१५९ धावांचे लक्ष्य इंग्लंडने केवळ १३.५ षटकांत १ विकेट गमावून सहज गाठले. फिल सॉल्टने ४२ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या, तर कर्णधार हॅरी ब्रूकने अवघ्या ३५ चेंडूत ७९ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकार होते. जोस बटलर मात्र ८ धावांवर बाद झाला.

या पराभवामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, इंग्लंडने ऐतिहासिक मालिका विजय मिळवत घरच्या मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

Exit mobile version