तिसऱ्यांदा टी-२० चा बादशाह भारत!

न्यूझीलंडला ९६ धावांनी नमवत तिसऱ्यांदा जगज्जेतेपद

तिसऱ्यांदा टी-२० चा बादशाह भारत!

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आज आणखी एक सुवर्णपान जोडले गेले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल ९६ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपदावर कब्जा केला. या ऐतिहासिक विजयामुळे घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

भारतीय संघाने दिलेल्या २५६ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम १९ षटकांत १५९ धावांवर गारद झाली.

न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातच भारताच्या गोलंदाजांनी हादरवून टाकली. सेमीफायनलमध्ये शतक ठोकणारा फिन अ‍ॅलन केवळ ९ धावांवर अक्षर पटेलचा बळी ठरला. त्यानंतर रचिन रवींद्र १ धाव, ग्लेन फिलिप्स ५ धावा, तर मार्क चॅपमन ३ धावा करून माघारी परतले.

डेरिल मिचेललाही मोठी खेळी करता आली नाही. तो १७ धावांवर बाद झाला. एका टोकाला टिम सीफर्टने झुंजार फलंदाजी करत २६ चेंडूत ५२ धावा केल्या, पण वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर ईशान किशनकडे झेल देत तो बाद झाला. कर्णधार मिचेल सँटनरने ४३ धावा केल्या, मात्र त्याला साथ मिळाली नाही.

भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने अफलातून गोलंदाजी करत ४ षटकांत फक्त १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने ३ बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेत न्यूझीलंडची डाव संपवला.

याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकांत ९८ धावांची भागीदारी करत भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली.

अभिषेक शर्माने केवळ २१ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी करत ४६ चेंडूत ८९ धावा ठोकल्या. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशननेही २५ चेंडूत ५४ धावांची स्फोटक खेळी करत प्रेक्षकांना आनंदाचा वर्षाव दिला. शेवटच्या षटकांत शिवम दुबेने ८ चेंडूत नाबाद २६ धावा करत भारताचा डाव ५ बाद २५५ पर्यंत नेला.

हा टी-२० विश्वचषकातील नॉकआउट सामन्यातील सर्वात मोठा धावसंख्येचा विक्रमही ठरला.

या विजयासह भारताने २००७ आणि २०२४ नंतर तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला, तसेच सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला.

अहमदाबादच्या मैदानावर लाखो भारतीय चाहत्यांच्या जल्लोषात तिरंगा अभिमानाने फडकला आणि पुन्हा एकदा संपूर्ण देशात एकच नारा घुमला —

“चक दे इंडिया! भारत विश्वविजेता!”

Exit mobile version