भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच महिला नेशन्स कप स्पर्धेत दमदार कामगिरी कायम राखत उपांत्य फेरीत चिलीचा ६-० असा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. ऑकलंड येथे झालेल्या या एकतर्फी सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत सलग चौथा विजय नोंदवला.
भारताच्या विजयात नवनीत कौर (६वे, १३वे मिनिट), दीपिका (१४वे, १८वे मिनिट), नेहा (३२वे मिनिट) आणि रुतुजा दादासो पिसल (३९वे मिनिट) यांनी गोलांची बरसात केली. सर्वांगीण खेळासाठी कर्णधार सलीमा टेटे हिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच चिलीवर दबाव निर्माण केला. सहाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नवनीत कौरने गोल करत खाते उघडले. त्यानंतर १३व्या मिनिटाला तिने दुसरा गोल झळकावत भारताची आघाडी दुप्पट केली.
याच लयीत खेळणाऱ्या भारतासाठी ड्रॅगफ्लिकर दीपिकाने १४व्या आणि १८व्या मिनिटाला दोन गोल झळकावत संघाला ४-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतील तिचा हा सहावा गोल ठरला असून ती सध्या सर्वाधिक गोल करणारी खेळाडू बनली आहे.
दुसऱ्या सत्रातही भारतीय संघाने आक्रमक खेळ कायम ठेवला. नेहाने ३२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर ३९व्या मिनिटाला रुतुजा पिसलने शानदार रिव्हर्स हिटद्वारे सहावा गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून जेतेपदासाठी आता भारताची लढत अमेरिका आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या विजेत्या संघाशी होणार आहे.
