इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सचा परक्या मैदानावरील खराब फॉर्म कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या सामन्यात मुंबईला २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
पावसामुळे सामना ११-११ षटकांचा करण्यात आला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत ३ बाद १५० धावा केल्या. यामध्ये यशस्वी जयस्वालने ३२ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूत ३९ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा डाव ९ बाद १२३ धावांवर मर्यादित राहिला.
दरम्यान, आयपीएल २०२३ पासून परक्या मैदानावर मुंबई इंडियन्सची कामगिरी सातत्याने खालावत चालली आहे. या कालावधीत संघाने एकूण २५ सामने खेळले असून त्यापैकी १६ सामन्यांत पराभव झाला आहे, तर केवळ ९ सामन्यांत विजय मिळवला आहे. या कामगिरीनुसार मुंबईचा विजयाचा टक्का केवळ ३६ इतकाच आहे.
आयपीएल २०२६ हंगामात मुंबईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यामध्ये एक विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी असून संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.







