बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. रविवारी ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत पाकिस्तानचा ११ धावांनी पराभव झाला. या विजयासह बांगलादेशने मालिका २-१ अशी जिंकली.
मात्र तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाने अंपायरिंगच्या निर्णयावर आक्षेप घेत अधिकृत तक्रार नोंदवली आहे. संघ व्यवस्थापनाने सामनादरम्यान ऑन-फिल्ड अंपायरने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयाविरोधात मॅच रेफरीकडे आक्षेप नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद सामन्याच्या शेवटून दुसऱ्या चेंडूवरील एलबीडब्ल्यू रिव्ह्यूशी संबंधित आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की बांगलादेशच्या संघाने मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला, जो नियमांच्या विरोधात आहे. नियमांनुसार कोणत्याही संघाने रिप्ले स्क्रीनवर येण्यापूर्वीच रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
त्या निर्णायक क्षणी पाकिस्तानला विजयासाठी २ चेंडूत १२ धावांची गरज होती. बांगलादेशचा गोलंदाज रिशाद हुसेन याच्या चेंडूवर फलंदाज शाहीन शाह आफ्रिदी चुकला आणि चेंडू लेग साइडला गेला. ऑन-फिल्ड अंपायरने सुरुवातीला तो वाइड दिला होता. मात्र काही चर्चेनंतर बांगलादेशने एलबीडब्ल्यूसाठी रिव्ह्यू घेतला, जरी चेंडू आफ्रिदीच्या पायाला किंवा शरीराला लागलेला नव्हता.
पाकिस्तानचा दावा आहे की स्क्रीनवर रिप्ले दिसल्यानंतरच रिव्ह्यू घेण्यात आला, ज्यामुळे निर्णयावर परिणाम झाला. तसेच बांगलादेशने रिव्ह्यू घेण्यासाठी दिलेल्या १५ सेकंदांच्या मर्यादेपेक्षा अधिक वेळ घेतला, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. मात्र अधिकृत प्रसारणात टाइमर न दाखवल्यामुळे रिव्ह्यू वेळेत घेतला गेला की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या तक्रारीद्वारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेमकी कोणती कारवाई अपेक्षित आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र मॅच रेफरीकडून स्पष्टीकरण किंवा माफी मिळाल्यास हा वाद शांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ नंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या या पहिल्या वनडे मालिकेदरम्यान अनेकदा खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः सलमान अली आगा यांचा रनआउट हा मोठा वाद ठरला. बांगलादेशने केलेली अपील पाकिस्तानने खेळभावनेच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.







