टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारताच्या झोळीत टाकणारा कर्णधार रोहित शर्मा आता आणखी एका मोठ्या ध्येयासाठी सज्ज झाला आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची सल अजूनही त्याच्या मनात ताजी आहे. त्यामुळे २०२७ चा वनडे विश्वचषक फक्त खेळायचा नाही, तर देशासाठी जिंकायचाच, असा ठाम निर्धार त्याने व्यक्त केला आहे.
बुधवारी आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, “मला २०२७ चा विश्वचषक फक्त खेळायचा नाही, तर २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये हातातून निसटलेली ट्रॉफी उचलायची आहे.”
तो पुढे म्हणाला, “मी ५० षटकांच्या विश्वचषकाकडे पाहत मोठा झालो. त्या वेळी टी-२० विश्वचषक नव्हता, आयपीएल नव्हतं. चार वर्षांनी येणारा तोच क्रिकेटमधील सर्वोच्च क्षण होता. त्या एका ट्रॉफीचं ओझं खूप मोठं होतं. मला ती ट्रॉफी मनापासून हवी आहे. त्यामुळे ती मिळवण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद आणि कुवत पणाला लावणार आहे. देशासाठी विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.”
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितच्या वय आणि फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्याने फिटनेसवर विशेष मेहनत घेत वजन घटवले आहे. त्याच्या फलंदाजीतही सकारात्मक बदल दिसून येत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिका साधारण गेली असली, तरी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने दमदार खेळी साकारत आपली लय परत मिळवली आहे.
रोहितची फिटनेस आणि फॉर्मकडे असलेली बांधिलकी पाहता, २०२७ विश्वचषकासाठी त्याची जिद्द आणि समर्पण स्पष्ट दिसून येते.
वनडे क्रिकेटमधील अव्वल सलामीवीरांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने आतापर्यंत २८२ सामन्यांतील २७४ डावांत ३३ शतके आणि ६१ अर्धशतकांच्या जोरावर ११,५७७ धावा केल्या आहेत.







