भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी आयपीएलमधील वाढत्या फलंदाजांच्या वर्चस्वाबाबत चिंता व्यक्त करत स्पर्धेतील काही नियमांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. विशेषतः २०२३ पासून लागू करण्यात आलेल्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे खेळाचा समतोल बिघडत असल्याचे सांगत त्यांनी हा नियम रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, टी-२० क्रिकेट आधीच फलंदाजांसाठी अनुकूल आहे आणि अशा परिस्थितीत अतिरिक्त फलंदाजाला संधी देणारा नियम गोलंदाजांवर अन्याय करणारा ठरत आहे.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, फक्त २० षटकांच्या सामन्यात संघाला आणखी एक फलंदाज वापरण्याची मुभा दिल्याने खेळातील नैसर्गिक संतुलन ढासळत आहे. आधीच छोट्या सीमारेषा, सपाट खेळपट्ट्या आणि आक्रमक फलंदाजीमुळे गोलंदाजांपुढे मोठे आव्हान उभे असते. त्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे फलंदाजांची ताकद आणखी वाढत असल्याने गोलंदाजांसाठी परिस्थिती अधिक कठीण बनली आहे.
हे ही वाचा:
धारधार युक्तिवाद करणारा, संवेदनशील माणूस…
चीनमध्ये बेकायदेशीर खाण कोसळली; पाच जणांचा मृत्यू
लेबनॉनमधील ९०० वर्षे जुना ब्यूफोर्ट किल्ला इस्रायलच्या ताब्यात
पुणे – गुवाहाटीच्या विमानात बॉम्बची चिठ्ठी
तेंडुलकर यांनी केवळ या नियमाला विरोध केला नाही, तर खेळ अधिक संतुलित करण्यासाठी दोन महत्त्वाचे पर्यायही सुचवले आहेत. त्यातील पहिला प्रस्ताव म्हणजे प्रत्येक संघातील एका गोलंदाजाला चारऐवजी पाच षटके टाकण्याची परवानगी देण्यात यावी. त्यांच्या मते, संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला अधिक षटके टाकण्याची संधी मिळाली तर सामन्यावर त्याचा प्रभाव वाढेल. सर्वोत्तम फलंदाज संपूर्ण २० षटके खेळू शकतो, तर सर्वोत्तम गोलंदाजाला अतिरिक्त षटक टाकण्याची संधी का मिळू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय त्यांनी पॉवरप्लेच्या नियमातही बदल सुचवला आहे. सध्याच्या नियमानुसार पहिल्या सहा षटकांत क्षेत्ररक्षणावर निर्बंध असतात. मात्र तेंडुलकर यांच्या मते, पहिली चार षटके फलंदाजांसाठी राखून ठेवावीत आणि उर्वरित दोन षटके क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला त्याच्या रणनीतीनुसार वापरण्याची मुभा द्यावी. या दोन षटकांमध्ये सीमारेषेबाहेर अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी मिळाल्यास गोलंदाजांनाही आक्रमक डावपेच आखता येतील आणि सामन्यातील स्पर्धात्मकता वाढेल.
गेल्या काही आयपीएल हंगामांमध्ये २०० पेक्षा अधिक धावसंख्या सामान्य झाली आहे. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समतोलाचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर आला आहे. यापूर्वीही रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंनी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर टीका केली होती. त्यांच्या मते, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असून संघरचनेतील कौशल्यपूर्ण नियोजनावर परिणाम होत आहे. आता सचिन तेंडुलकर यांनीही याच मुद्द्यावर आवाज उठवल्याने आयपीएलच्या नियमांबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. आगामी काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएल व्यवस्थापन या सूचनांकडे कसे पाहते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
