भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाच्या गोह सेफेई आणि नूरइजुद्दीन जोडीचा १९-२१, २२-२०, २१-१६ असा पराभव केला.
जगातील चौथ्या क्रमांकाची भारतीय जोडी हा सामना १ तास २२ मिनिटांत जिंकत २०२६ हंगामातील आपल्या पहिल्या अंतिम फेरीत पोहोचली. या विजयासह मलेशियन जोडीविरुद्ध सात्विक-चिराग यांचा विक्रम आता ८-२ असा झाला आहे.
पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये २०-२० अशी बरोबरी झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी निर्णायक गुण मिळवत गेम २२-२० असा जिंकला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये त्यांनी पूर्ण वर्चस्व राखत २१-१६ असा विजय मिळवला.
रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सात्विक-चिराग यांचा सामना इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो-डॅनियल मार्थिन किंवा चीनच्या ही जी टिंग-रेन जियांग यू जोडीशी होणार आहे.
