मधल्या फळीतला भरोसेमंद फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात परतला आहे. रविवारी वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ४७ चेंडूंमध्ये ४९ धावांची खेळी करत आपण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले होते. बुधवारी राजकोट येथे मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर भारतीय संघाकडून सर्वात जलद ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण करू शकतो.
राजकोटमध्ये श्रेयस अय्यर आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ६९ वा डाव खेळणार आहे. या सामन्यात त्याने ३४ धावा केल्यास त्याच्या ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण होतील. ही कामगिरी साध्य झाल्यास, तो भारताकडून एकदिवसीय प्रकारात सर्वात जलद ३,००० धावा करणारा फलंदाज ठरेल.
सध्या भारताकडून सर्वात जलद ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्याचा विक्रम माजी सलामीवीर शिखर धवन यांच्या नावावर आहे. धवन यांनी ७२ डावांत हा टप्पा गाठला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्यांनी ७५ डावांत ही कामगिरी केली होती. श्रेयस अय्यर हा विक्रम मोडल्यास तो केवळ धवन आणि कोहलीलाच नव्हे, तर केएल राहुल (७८ डाव), नवज्योत सिंग सिद्धू (७९ डाव) आणि सौरव गांगुली (८२ डाव) यांनाही मागे टाकेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३,००० धावा पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या माजी सलामीवीर हाशिम आमला यांच्या नावावर आहे. आमलाने अवघ्या ५७ डावांत हा टप्पा गाठला होता.
श्रेयस अय्यरच्या एकदिवसीय कारकिर्दीकडे पाहिले, तर सध्या तो भारतीय संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानला जातो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने भारताला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात तसेच २०२५ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
३१ वर्षीय श्रेयस अय्यरने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. दुखापतींनी प्रभावित झालेल्या कारकिर्दीत आतापर्यंत त्याने ७४ सामन्यांतील ६८ डावांत ५ शतके आणि २३ अर्धशतकांच्या मदतीने २,९६६ धावा केल्या आहेत. नाबाद १२८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
