मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला फूड पॉइझनिंगचा संशय व्यक्त केला जात असताना, पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलेल्या निष्कर्षांमुळे आता हे प्रकरण संशयास्पद बनले आहे.
मृतांच्या शरीरात मॉर्फिनसारख्या तीव्र वेदनाशामक औषधाचे अंश आढळले असून हत्या की आत्महत्या, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, तसेच मुली आयशा आणि जैनब यांनी शनिवारी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाऊन झोप घेतली होती. रविवारी सकाळी चौघांची प्रकृती चिंताजनक झाली होती, त्यांना तत्काळ जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.,उपचार सुरू असताना चौघांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जी जिंकाव्या, अशी बांगलादेशी खासदाराची इच्छा…
मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन जप्त
सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!
एप्रिल २०२६ मध्ये जीएसटी महसूल विक्रमी
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांच्या शरीरात मॉर्फिनचे अंश आढळले आहे, त्यामुळे केवळ अन्न विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता कमी होत चालली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या प्रकरणात स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. सहायक आयुक्त अनुपमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरातून ११ अन्न नमुने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये बिर्याणी, कलिंगड, पिण्याचे पाणी, कच्चे व शिजवलेले तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश आहे. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जेजे मार्ग पोलिस ठाणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक रईस शेख यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व शक्य तितक्या कोनातून तपास केला जात आहे. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चौघांच्या मृत्यूमागील खरे कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







