पुण्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे एक मोठे झाड अचानक कोसळले. त्या वेळी रस्त्यावरून जात असलेल्या तीन जणांवर हे झाड पडले. यामध्ये रंजना गिरी या महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
‘वन अविघ्न पार्क’ मधील जैन मंदिरातील चोरीचा उलगडा
ट्रम्प-इराण तणावाने बाजारात भूकंप; मोठ्या घसरणीनंतर पुन्हा सावरला शेअर बाजार
“प. बंगालच्या मालदामधील घटना म्हणजे न्यायालयाच्या अधिकाराला दिलेले आव्हान”
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आणि झाडाखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र, महिलेचा जीव वाचवता आला नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे पुण्यात केवळ ही एकच घटना घडलेली नाही. शहरातील विविध भागांमध्ये झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद पडले, तर काही भागांत वाहनांच्या रांगा लागल्या.
दरम्यान, राज्यातील इतर भागांमध्येही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत आहे. वीजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे जीवितहानीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात अशाच पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्रात जोरदार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा इशारा दिला आहे. काही भागांसाठी ‘रेड अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेनेही तातडीने पावले उचलत आपत्कालीन पथके तैनात केली आहेत. झाडे कोसळण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पाणी साचलेल्या भागांमध्ये तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. एकूणच, अवकाळी पावसामुळे पुण्यातील परिस्थिती चिंताजनक बनली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.







