‘कोक्रॉच’ आंदोलनानंतर झाला ६० मेट्रिक टन कचरा

नवी दिल्ली महानगर परिषदेची विशेष मोहीम

‘कोक्रॉच’ आंदोलनानंतर झाला ६० मेट्रिक टन कचरा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे संपलेल्या आंदोलनानंतर परिसरात साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवी दिल्ली महानगर परिषद (NDMC) ला मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवावी लागली. आंदोलन संपल्यानंतर अवघ्या काही तासांत सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत जवळपास ६० मेट्रिक टन कचरा हटवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर शनिवारी आंदोलकांनी जंतर-मंतर परिसर रिकामा केला. त्यानंतर NDMC ने रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी स्वच्छता कर्मचारी, जड वाहने आणि यांत्रिक स्वच्छता उपकरणे तैनात करण्यात आली.

स्वच्छता मोहीम जंतर-मंतर, टॉलस्टॉय मार्ग, संसद मार्ग, जयसिंग मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरात राबवण्यात आली. NDMC च्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ७५ स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते, तर रविवारी सकाळपासून आणखी ३५ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपर्यंत सुमारे ४० मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला होता. त्यानंतर रविवारी सकाळी आणखी १२ मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेसाठी आठ ऑटो-टिपर्स, दोन जड ट्रक, एक उत्खनन यंत्र (एक्स्कॅव्हेटर) आणि तीन प्रेशर-जेट मशीन तैनात करण्यात आली होती. रस्ते धुण्यासाठी जेटिंग मशीनचा, तर रस्त्यांच्या साफसफाईसाठी यांत्रिक रोड स्वीपर्सचा वापर करण्यात आला.

केवळ कचरा हटवण्यापुरतेच हे काम मर्यादित नव्हते. आंदोलनादरम्यान भिंतींवर लिहिलेले घोषवाक्ये हटवण्यासाठी भिंतींना पुन्हा रंग देण्यात आला. तसेच तुटलेले पदपथ, कर्बस्टोन आणि इतर सार्वजनिक मालमत्तेची दुरुस्ती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे धुऊन पूर्ववत करण्याचे कामही या मोहिमेत करण्यात आले.

हे ही वाचा:

आयटीचा ‘पॉवर प्ले’! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी

मालीत भारतीय हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; ४४ कोटींची ‘डील’

२०२७ ठरणार पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष? एल निनोचा प्रभाव कायम

विजेसाठी १२ वर्षांचा संघर्ष; जनता दरबारानंतर घरात प्रथमच पेटला बल्ब

NDMC च्या माहितीनुसार, आंदोलनाच्या अखेरच्या दिवसांत कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. शुक्रवारीच सुमारे २७ मेट्रिक टन मिश्र कचरा हटवण्यात आला होता, तर त्याआधीच्या दिवशी हा आकडा सुमारे १५ मेट्रिक टन होता. आंदोलन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा शिल्लक राहिल्याने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज भासली. या घटनेनंतर सार्वजनिक आंदोलनांदरम्यान निर्माण होणारा कचरा, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि आंदोलनानंतर स्वच्छतेची जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version