भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा असे ओपनर मिळाले आहेत, जे समोरच्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवतात. अभिषेक शर्मा… नाव तरुण, पण खेळात मात्र जुन्या काळातील दिग्गजांची छाया. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांनी अभिषेकची थेट तुलना श्रीलंकेचे महान फलंदाज सनथ जयसूर्याशी करत त्याच्या आक्रमकतेचं मनापासून कौतुक केलं आहे.
धर्मशालाच्या थंड वातावरणात आफ्रिकन गोलंदाजांना अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीपुढे घाम फुटला. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत २–१ ची आघाडी घेतली आहे. या विजयामागे भारतीय गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा आणि अभिषेक शर्माची निर्भय फलंदाजी निर्णायक ठरली.
भारतीय गोलंदाजांनी घातला लगाम
भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. प्रत्येक गोलंदाजाने किमान एक विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत फक्त ११७ धावांवर रोखलं. कमी धावसंख्येचं दडपण फलंदाजांनी सहज झेललं.
अभिषेकची फलंदाजी म्हणजे वीज
लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा मैदानात उतरला आणि पहिल्याच काही चेंडूंमध्ये सामन्याची दिशा स्पष्ट केली. लुंगी एनगिडीच्या पहिल्याच षटकात मिळालेल्या आत्मविश्वासानंतर अभिषेक थांबलाच नाही.
जियोस्टारवर बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाले,
“सीरिजपूर्वीच तो सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत धडाकेबाज फॉर्ममध्ये होता. पहिलाच चेंडू त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.”
जयसूर्याची आठवण का येते?
उथप्पांनी अभिषेकची तुलना थेट सनथ जयसूर्या यांच्याशी करताना म्हटलं,
“टी-२० क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक षटकार मारणं ही काही साधी गोष्ट नाही. तो शक्तिशाली, गतिमान आणि पूर्णपणे दबदबा राखणारा ओपनर आहे. जयसूर्यासारखा… ज्याच्यामुळे गोलंदाज आधीच मानसिक दबावाखाली येतात.”
जयसूर्याप्रमाणेच अभिषेकही पहिल्याच षटकांपासून सामन्यावर पकड घेतो, फिल्डिंग बदलायला भाग पाडतो आणि गोलंदाजांच्या योजना उद्ध्वस्त करतो — हीच खरी तुलना.
प्लॅनवर मात करणारा फलंदाज
उथप्पांनी पुढे सांगितलं की संघ आता अभिषेकसाठी खास योजना आखत आहेत, पण त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे.
“तो प्रोॲक्टिव्ह आहे. गोलंदाज कुठे अडवायचा प्रयत्न करतात, हे त्याला ठाऊक आहे आणि त्यावर उपायही.”
सूर्यकुमार यादवची स्मार्ट कप्तानी
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव यांचं नेतृत्वही उठून दिसलं. गोलंदाजांची योग्य वेळी अदलाबदल, वेगवान गोलंदाजांचे स्पेल वाढवणं आणि गरज पडल्यावर दुबे–हार्दिकवर विश्वास ठेवणं — हे सगळं ‘समजूतदार कप्तानी’चं उदाहरण असल्याचं उथप्पांनी स्पष्ट केलं.







