उत्तराखंडच्या चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू

एक जण अजूनही अडकला

उत्तराखंडच्या चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात पाणी आणि मलबा घुसल्याने मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत सात कामगारांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. तर एक कामगार अद्याप बोगद्यात अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

चमोली जिल्ह्यातील मयापूर (पिपलकोटी) येथील THDC च्या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात गुरुवारी संध्याकाळी अचानक पाणी आणि मोठ्या प्रमाणात मलबा घुसला. या वेळी बोगद्यात कामगारांची शिफ्ट सुरू होती. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक कामगार बोगद्याच्या बाहेरच्या दिशेने ढकलले गेले.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा घुसला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. SDRF आणि NDRFच्या पथकांकडून मलबा हटवून अडकलेल्या कामगाराचा शोध घेतला जात आहे.

चमोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नद्या आणि जलप्रवाहांच्या पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांसाठी डोप टेस्ट अनिवार्य

नांदेडमध्ये अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला

बांगलादेश अंधारात! १० तास लोडशेडिंग, ८ वाजताच दुकानं बंद

पंजाबमध्ये ‘हायटेक कॉपी’ प्रकरणानंतर ४५४ फार्मसी ऑफिसरच्या भरतीला ब्रेक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव आणि मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत असून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. अडकलेल्या कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, सुरुवातीच्या माहितीनुसार बोगद्यात अनेक कामगार अडकल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बचावकार्य वेगाने राबवण्यात आले. मात्र, दुर्घटनेनंतर परिस्थिती गंभीर बनली असून मृतांचा आकडा वाढला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत सात जणांचा मृत्यू, १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून एक कामगार अद्याप बेपत्ता आहे.

Exit mobile version