स्वातंत्र्यदिनी दिल्ली मेट्रो पहाटे ४ वाजल्यापासून धावणार!

लाल किल्ल्यावरील सोहळ्यासाठी विशेष सुविधा

स्वातंत्र्यदिनी दिल्ली मेट्रो पहाटे ४ वाजल्यापासून धावणार!

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने प्रवाशांसाठी विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी विशेष पाहुणे, निमंत्रित तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेत पोहोचता यावे, यासाठी दिल्ली मेट्रोची सेवा नेहमीपेक्षा तब्बल दोन तास आधी सुरू होणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजल्यापासून सर्व टर्मिनल स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहाटे ४ ते नियमित सेवा सुरू होईपर्यंत सर्व मार्गांवर दर ३० मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. नियमित प्रवासी सेवा सकाळी ६ वाजल्यापासून नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांनी गर्दी आणि रस्त्यांवरील वाहतूक निर्बंध लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आशिया कपआधी दीप्तीचा गेमप्लॅन तयार

भारताचा परकीय चलनसाठ्यात विक्रमी वाढ; ७०७ अब्ज डॉलरचा टप्पा पार

५१ वर्षांचा दुष्काळ संपवणार; मनप्रीतचा ‘मिशन वर्ल्ड कप’!

अभिषेक पोरेलच्या जामीन अर्ज फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी लाल किल्ला, जामा मशीद आणि दिल्ली गेट ही जवळची मेट्रो स्थानके राहणार आहेत. विशेष पाहुणे आणि निमंत्रितांसाठी संरक्षण मंत्रालयाला १.३० लाख विशेष प्री-व्हेंडेड QR तिकिटे देण्यात आली आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले वैध प्रवेशपत्र असलेल्या निमंत्रितांना काही निश्चित मेट्रो स्थानकांवर ही QR तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या विशेष QR तिकिटांद्वारे होणाऱ्या प्रवासाचा खर्च संरक्षण मंत्रालयाकडून दिल्ली मेट्रोला परत केला जाणार आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. लाल किल्ल्याच्या परिसरातील काही मार्गांवर वाहतूक निर्बंध आणि मार्गबदल लागू राहणार असल्याने नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दिल्ली मेट्रोने नागरिकांना उड्डाणपुलांजवळ किंवा एलिव्हेटेड मेट्रो मार्गांच्या परिसरात पतंग न उडवण्याचा सल्ला दिला आहे. मेट्रोच्या विद्युत तारांमध्ये पतंग किंवा मांजा अडकल्यास सेवा विस्कळीत होण्याबरोबरच गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version