अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती (कोकण प्रांत), मुंबई उपनगर शाखेच्या वतीने महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढरंग’ या काव्यपुष्पाचे आयोजन करण्यात आले. बोरिवली पूर्व येथील श्रीमती जयाबेन खोत शाळेत ९ ऑगस्ट २०२६ रोजी हा काव्यवाचनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात पनवेलपासून अंधेरी, बोरिवली ते विरार परिसरातील २२ नवोदित व हौशी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भाग्यश्री फडके-धर्माधिकारी यांनी परिषद गीत सादर केले. साहित्य भारतीचे मुंबई उपनगराचे संपर्क प्रमुख जयेश मेस्त्री यांनी प्रास्ताविकातून ‘आषाढरंग’ या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी साहित्य, कविता आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या साहित्य भारतीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यानंतर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘सांगुनी गेले मज भीमराव’ ही कविता सादर करण्यात आली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी कवी-कवयित्रींच्या कवितांचा थोडक्यात आढावा घेत मार्गदर्शन केले. कविता ही अत्यंत अवघड साहित्यप्रकार असून तिच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कवीने मोठ्या प्रमाणात कविता वाचल्या पाहिजेत, अनुभव घेतला पाहिजे आणि लेखनासाठी अधिक मेहनत घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कवितेतील अनुभवाच्या सखोलतेचे महत्त्व विशद करताना अनुराधा नेरूरकर म्हणाल्या की, ज्या प्रकारे वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर जाऊन जीवनरस शोषून घेतात आणि त्यातून ओलावा निर्माण होतो, त्याचप्रमाणे कवितेच्या मुळाशी अनुभवाची खोली आणि विचारांची सखोलता असली पाहिजे. त्या अनुभवाचा आणि विचारांचा ओलावा कवितेत उतरला, तरच ती कविता वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचते. “आपण कवितेकडे नाही, तर कवितेने आपल्याकडे यायला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
स्लोव्हेनियातील भारतीय दूतावासाच्या परिसराचे नुकसान; भारताकडून तीव्र निषेध
आता उत्तर प्रदेशमध्ये गोमूत्राची १० रुपये प्रतिलिटर दराने खरेदी
नंबर वनशी भिडणार, आयुष स्वतःची वाट घडवणार!
राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का?
यावेळी अनुराधा नेरूरकर यांनी पावसाची दोन वेगवेगळी रूपे उलगडणाऱ्या कविता सादर केल्या. तसेच त्यांची प्रसिद्ध ‘वालाचे बिरड्याची’ ही कविता सादर करताना आजी, आई आणि नात या स्त्रीच्या विविध रूपांतून स्त्रीजीवनाचे भावविश्व प्रभावीपणे मांडले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
साहित्य भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष व लेखक दुर्गेश सोनार हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी कविता जन्माला येण्यापूर्वीच्या अनुभवांविषयी भाष्य केले.
‘आषाढरंग’मध्ये सहभागी कवी-कवयित्रींनी पावसाची विविध रूपे, निसर्ग, मानवी भावना, सामाजिक जाणिवा आणि जीवनानुभव आपल्या कवितांमधून मांडले. नवोदित कवींना आपली कविता रसिकांसमोर सादर करण्यासाठी मिळालेले हे व्यासपीठ त्यांच्या साहित्यिक प्रवासाला प्रोत्साहन देणारे ठरले. सर्व सहभागी कवी-कवयित्रींना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे नेटके आणि नेमके निवेदन विठ्ठल घाडी यांनी केले. आभार प्रदर्शन भाग्यश्री फडके-धर्माधिकारी यांनी केले. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर उन्हेलकर आणि त्यांचे सहकारी, तसेच सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव रानडे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
साहित्य भारतीच्या वतीने यापुढे दर महिन्याला साहित्यिक कार्यक्रम, अभिवाचन, मुलाखती आणि विविध साहित्यविषयक उपक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान अनेक जणांनी साहित्य भारतीचे सदस्यत्व स्वीकारले. सर्वांच्या सहकार्यामुळे ‘आषाढरंग’ हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमातील मान्यवरांना देण्यात आलेली नाविन्यपूर्ण रोपे ही विठ्ठल घाडी यांच्या स्टार्टअप उद्योगातील होती. साहित्य आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवणारी ही भेटही कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली.
