नेपाळात सुरु झालेल्या जेन-झेड आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा भारत-नेपाळ सीमेजवळील उत्तराखंडातील बनबसा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. मागील तीन दिवसांपासून सीमेवर शुकशुकाट असून स्थानिक व्यापाऱ्यांचा ९० टक्क्यांहून अधिक व्यवसाय ठप्प झाला आहे. बनबसा बाजार प्रामुख्याने नेपाळी ग्राहकांवर अवलंबून आहे, त्यामुळे आता बाजार पूर्णपणे ओस पडला आहे. व्यापाऱ्यांना दररोज ४० ते ५० लाख रुपयांचे अंदाजे नुकसान सहन करावे लागत आहे. नेपाळातील कंचनपुर जिल्ह्यातील महेंद्रनगर येथे लागू केलेल्या कर्फ्यूमुळे सीमेवरील ये-जा पूर्णपणे बंद आहे, ज्याचा थेट फटका भारतीय बाजाराला बसला आहे. स्थानिक व्यापारी आता नेपाळात शांतता प्रस्थापित होण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून त्यांचा व्यापार पुन्हा मार्गी लागू शकेल.
नेपाळात सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या जेन-झेड आंदोलनाने देशाला हादरवून सोडले. सुरुवातीला हे आंदोलन सोशल मीडियावरील निर्बंधांविरोधात होते, पण लवकरच ते भ्रष्टाचार, नातेसंबंधवाद (नेपो किड्सचे ऐषआराम जीवन) आणि आर्थिक असमानता यांच्या विरोधात व्यापक निदर्शनांत रूपांतरित झाले. १३ ते २८ वयोगटातील तरुणाईने काठमांडू आणि इतर शहरांत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिस कारवाईत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक जखमी झाले. अखेर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान करण्यात आले असून त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. नेपाळ आर्मीने सुरक्षा हाती घेतली आहे आणि कर्फ्यूदरम्यान सकाळ-संध्याकाळ सूट दिली जात आहे, मात्र परिस्थिती अद्याप पूर्णपणे सामान्य झालेली नाही.
हेही वाचा..
नेपाळमधील अस्थिरतेचा दुर्गापूजेला फटका; “यंदा मंडप नाही, मंदिरातच पूजा”
ट्रम्प म्हणतात, रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर शुल्क लादणे सोपे काम नाही
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी
“मोदींना आईचं दर्शन शुभ… राहुल गांधींना दिसतात ईडी, सीबीआय आणि परदेशी मालमत्ता”
या अशांततेचा परिणाम भारत-नेपाळ सीमेवर स्पष्ट दिसत आहे. चंपावत जिल्ह्यातील बनबसा बाजार नेपाळच्या महेंद्रनगरलगत आहे. हा बाजार नेपाळी ग्राहकांसाठी मीठ, तेल, साखर, मसाले, परचून सामान, भाजीपाला, गूळ यांसारख्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा प्रमुख पुरवठादार आहे. याशिवाय कपडे, हार्डवेअर, मोटर पार्ट्स, औषधे आणि इतर महत्वाचे सामानही येथेून नेपाळात निर्यात होते. सामान्य दिवसांत हा बाजार नेपाळच्या हजारो ग्राहकांनी गजबजलेला असतो, मात्र आता नेपाळी ग्राहक न आल्यामुळे ९०-९५ टक्के दुकाने बंद आहेत. फक्त १० टक्के व्यापार स्थानिक भारतीय ग्राहकांवर टिकून आहे. व्यापारी दिवसभर दुकानांत रिकामे बसतात किंवा गादीवर पहुडतात. मीना बाजार पूर्णपणे ओस पडला आहे, जिथे अनेक दुकानदार संध्याकाळी ४ वाजताच घरी परततात.
स्थानिक व्यापारी संघटनेनुसार बनबसा येथील व्यापार पूर्णपणे नेपाळावर अवलंबून आहे. सामान्यतः येथे दररोज ६०-७० लाख रुपयांची उलाढाल होत असे, जी आता फक्त १-२ लाखांवर आली आहे. त्यामुळे आर्थिक संकट गडद झाले आहे. व्यापाऱ्यांना दशहरा आणि दिवाळीसारख्या प्रमुख सणांविषयी चिंता आहे. नेपाळात दशहरा हा सर्वात मोठा उत्सव आहे, ज्यावेळी बनबसा बाजारात दररोज २.५ ते ३ कोटी रुपयांचा व्यापार होतो. जर परिस्थिती अशीच राहिली तर सणासुदीवरही परिणाम होईल आणि व्यापाऱ्यांची उपजीविका धोक्यात येईल. १९६० पासून येथे व्यापार सुरु आहे, पण कोविड काळानंतर हा पहिलाच इतका वाईट टप्पा आल्याचे सांगितले जाते. नेपाळी व्यापाऱ्यांवरील लूटमारीच्या घटनांमुळे त्यांचा व्यवसायही कमी झाला आहे, ज्याचा फटका भारतीय व्यापाऱ्यांनाही बसत आहे.
व्यापार मंडळ अध्यक्ष भरत भंडारी म्हणाले, “नेपाळातील परिस्थिती कठीण आहे. आम्ही १९६० पासून येथे व्यापार करत आहोत. येथील ९० टक्के व्यवसाय नेपाळावर अवलंबून आहे. आंदोलनामुळे सर्व ठप्प झाले आहे. नेपाळातील लूटमारीमुळे व्यापारी मागे हटले आहेत. कोविडसारख्या आव्हानांना आम्ही सामोरे गेलो आहोत, पण हे अधिक तणावपूर्ण आहे. दशहरा-दिवाळीवर जर हीच स्थिती राहिली तर विक्री शून्य होईल. आमची उपजीविका हाच व्यापार आहे.”
महामंत्री अभिषेक गोयल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले, “बनबसा येथील व्यापार नेपाळावर अवलंबून आहे. सीमाभागातील बाजारपेठा सरहद्दीवर अवलंबून असतात. दररोजचा ६०-७० लाख रुपयांचा व्यापार आता १-२ लाखांवर आला आहे. आर्थिक नुकसान मोठे आहे. आशा आहे की लवकरच परिस्थिती सामान्य होईल आणि रोटी-बेटीचे नाते पुन्हा घट्ट होईल.” व्यापारी पंकजकुमार अग्रवाल म्हणाले, “स्थिती फारच वाईट आहे. दुकानात एकही ग्राहक नाही. आमचा व्यवसाय नेपाळावर अवलंबून आहे. तेथील परिस्थितीचा थेट परिणाम येथे होत आहे. परमेश्वराकडे प्रार्थना आहे की परिस्थिती लवकर सामान्य व्हावी, जेणेकरून व्यापार पुन्हा सुरु होईल.”







