भारतीय क्रिकेटच्या निर्णयाने बांग्लादेश सरकार अक्षरशः अस्वस्थ झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमधून हाकलून लावल्यानंतर, बांग्लादेश सरकारने थेट आयपीएलच्या टेलिकास्टवरच अनिश्चितकालीन बंदी घालण्याचा हास्यास्पद निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भारतीय क्रिकेट बोर्डाला काडीमात्र फरक पडणार नाही. उलट बांग्लादेशच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरतो आहे.
हा निर्णय म्हणजे क्रीडाक्षेत्रातला नव्हे, तर राजकीय संतापाचा उघड पुरावा आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या अंतर्गत निर्णयावरून संपूर्ण आयपीएलवर बंदी घालणे, ही बांग्लादेशची वैफल्यग्रस्त आणि असंयमी मानसिकता दर्शवते.
“कारण नाही” म्हणत भारतावर दोष, पण वास्तव वेगळेच
बांग्लादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात, “मुस्तफिजुरला आयपीएलमधून वगळण्यामागे कोणतेही योग्य कारण दिलेले नाही,” असा कांगावा करण्यात आला. मात्र सत्य हे आहे की, बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार, धार्मिक असहिष्णुता आणि अंतर्गत अस्थिरता यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बांग्लादेशची विश्वासार्हता ढासळत चालली आहे.
आपल्या अपयशांवर पडदा टाकण्यासाठी भारताला दोष देणे, ही बांग्लादेशची जुनीच सवय आहे.
