भारताने पाकिस्त्नानविरुद्ध राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची देशभरात चर्चा सुरु आहे. भारताच्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. अशातच छत्तीसगडच्या बिजापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १५ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ‘मिशन संकल्प’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
एप्रिलमध्येही याच जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले होते. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टाच्या टेकड्यांवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश नक्षलवाद संपवणे आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या उद्देशाने भारतीय सुरक्षा दल कारवाई करताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे तर अनेकांनी भयभीत होवून आत्मसमर्पण केले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेजवळ सुरक्षा दलांकडून मोठे अभियान राबविले जात आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे ज्यामध्ये सुमारे दहा हजार सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत.
५०० हून अधिक नक्षलवाद्यांना घेराव घातल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ज्या नक्षलवाद्यांना वेढण्यात आले आहे, त्यात हिडमा, देवा आणि विकास आहेत, जे नक्षलवाद्यांचे सर्वात मोठे कमांडर आहेत. नक्षलवादी हिडमावर तब्बल ६ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर आहे.
हे ही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’: दहशतवादी मसूद अझहर म्हणाला, मीही मेलो असतो तर बरे झाले असते!
भारताच्या लष्करी हल्ल्यांबद्दल चीन चिंतेत, म्हणाला ‘खेदजनक’
‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताचे प्रत्युत्तर’
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, देशातील नक्षलवाद आणि दहशतवाद्यांना ठार करण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला असून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ स्थळ उध्वस्त केले आहेत. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अनेक कमांडरचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यासह त्याचे जवळचे चार सहकारी देखील ठार झाले आहेत.
