पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील भागांना लक्ष्य करून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्त्नान भयभीत झाला आहे चीन देखील चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. भारताच्या लष्करी कारवायांवर चीनने चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना तणाव वाढवू नये असे आवाहन केले आहे.
या हल्ल्यांना उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी (७ मे) भारताच्या सकाळच्या कृतीला ‘खेदजनक’ म्हटले आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. “सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. ते चीनचेही शेजारी आहेत,” असे प्रवक्त्याने सांगितले.
“चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थिरतेच्या व्यापक हितासाठी कृती करण्याचे, शांत राहण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करू शकणारी कृती करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करतो,” असे प्रवक्त्याने पुढे म्हटले.
हे ही वाचा :
‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताचे प्रत्युत्तर’
ऑपरेशन सिंदूर: दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली प्रतिक्रिया; काय म्हणाले परराष्ट्र सचिव
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?
“भारताने कोटली, मुझफ्फराबाद, बहावलपूरमध्ये हल्ला केला!” पाकने केलं मान्य
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला , ज्यामध्ये चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. आरोग्य केंद्रांच्या नावाखाली दहशतवादी छावण्या सुरू असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने (IAF) या ठिकाणांवर कारवाई केली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांच्या हत्येचा बदला म्हणून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये जागतिक स्तरावर प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या प्रमुख पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.