वकील म्हणून हजर झालेल्या ममता बॅनर्जींविरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा

हिंसाचाराशी संबंधित याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी ममता न्यायालयात

वकील म्हणून हजर झालेल्या ममता बॅनर्जींविरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवार, १४ मे रोजी कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून हजर झाल्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी त्या न्यायालयात पोहोचल्या होत्या. मात्र, न्यायालयाबाहेर येताच त्यांच्या विरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा देण्यात आल्या.

संबंधित जनहित याचिका कोलकाता उच्च न्यायालयातील वकील आणि वरिष्ठ अधिवक्ता तसेच तृणमूल काँग्रेसचे चार वेळा खासदार राहिलेले कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र सिर्सन्या बॅनर्जी यांनी दाखल केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिर्सन्या बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा भाजपचे उमेदवार आणि माजी एनएसजी कमांडंट दीपांजन चक्रवर्ती यांनी १० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

या प्रकरणात ममता बॅनर्जी वकील म्हणून युक्तिवाद करत असून त्यासाठी त्या वकिलांचा पारंपरिक काळा कोट आणि पांढरा कॉलर-बँड परिधान करून कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. मुख्य न्यायमूर्ती सुजय पॉल आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठासमोर त्या सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या. यावर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालमधील ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयातही उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर थोडक्यात आपली बाजू मांडली होती. मात्र, त्या प्रकरणात त्या वकील म्हणून हजर झाल्या नव्हत्या.

हे ही वाचा:

‘देव देश आणि धर्म’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

तैवान प्रश्नात हस्तक्षेप करू नका; चीनचा अमेरिकेला स्पष्ट इशारा

कोलकाताचे माजी डीसीपी शंतनू सिन्हा बिस्वास यांना अटक

साखर निर्यातीवर बंदी; देशातील दर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दक्षिण कोलकात्यातील भवानीपूर मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर आणि स्वतःच्या भवानीपूरमधील पराभवानंतरही त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर करण्याची परंपरा पाळली नाही. निवडणुकीचा निकाल हा जनतेच्या खऱ्या कौलाचे प्रतिबिंब नसल्याचा दावा करत त्यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, राज्यपाल आर.एन. रवी यांनी मागील विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळही बरखास्त झाले.

Exit mobile version