“कोच बॅट घेऊन मॅच खेळत नाही!”

“कोच बॅट घेऊन मॅच खेळत नाही!”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत भारताला ०-२ अशी साफ झुंबडीत हार पत्करावी लागली असून, या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. मात्र, या सर्व टीकेच्या दरम्यान माजी ऑफस्पिनर आर. अश्विन यांनी गंभीरला जोरदार समर्थन दिलं आहे.

अश्विन आपल्या यूट्यूब शो ‘ऐश की बात’ मध्ये म्हणाले, “फक्त गौतम गंभीरलाच दोष देणं चुकीचं आहे. हा टीम गेम आहे. एक टीम मॅनेज करणं इतकं सोपं नसतं. पराभवाने तेही दुखी आहेत. चुका कोणाकडूनही होतात आणि त्या कधी महागात पडतात.” त्यांनी स्पष्ट केलं, “गौतम माझे नातेवाईक नाहीत. मी त्यांच्या दहा चुका सांगू शकतो. पण याचा अर्थ सर्व दोष त्यांच्यावर लादणं योग्य नाही.”

अश्विन पुढे म्हणाले, “कोच काय करू शकतो? त्याचं काम मैदानाबाहेर रणनीती आखणं आहे. मैदानात खेळाडूंनाच खेळायचं असतं. कोच बॅट घेऊन उतरणार नाही. हो, संघात रोटेशन खूप झालं आहे, पण शेवटी कामगिरी खेळाडूंनीच करायची असते.”

त्यांनी खेळाडूंवर थेट बोट ठेवलं. “मी खेळाडूंना जबाबदारी घेताना पाहिलं नाही. त्यामुळे कोच समस्या आहे असं मी मानत नाही. संघाच्या फायद्यासाठी काही चांगले निर्णय नक्की घेतले जाऊ शकतात,” असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, गंभीर कोच झाल्यापासून भारताचा घरच्या मैदानावरील टेस्ट रेकॉर्ड चिंताजनक ठरत आहे. जुलै २०२४मध्ये गंभीरने पदभार स्वीकारल्यानंतर भारताला घरच्या मैदानावर सलग दोन वेळा क्लिनस्वीप सहन करावा लागला आहे.

याआधी भारताला घरच्या मैदानावर पराभव झाला होता, परंतु क्लिनस्वीप केवळ एकदाच — २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता.

गंभीरकाळात संघात सतत केलेले बदल, अनुभव नसलेल्या किंवा टेस्ट रेकॉर्ड साधारण असलेल्या खेळाडूंना दिलेली संधी — या मुद्द्यांवरून गंभीरवर आरोप होत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की या प्रयोगांनी संघाचा समतोल बिघडला आणि भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

Exit mobile version