पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना व्हावी हे संशयास्पद आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे देशभर लोकोपयोगी कार्यक्रम सुरू असतानाच या कार्यक्रमांच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी उबाठा गट, खा. संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक रचलेले हे कारस्थान आहे का?, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी (१८ सप्टेंबर) केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विटंबना करणारा आरोपी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करून या घटनेमागचा ‘बोलविता धनी’ कोण याचा तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी बन यांनी राऊतांच्या ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या आरोपावर शरसंधान साधले. ते म्हणाले की, ईव्हीएमवर शंका घेणे म्हणजे जनतेच्या मतदानावर शंका घेणे आहे. मध्यप्रदेशातून मशिन येतात म्हणून संशय घेणे म्हणजे हास्यास्पद आहे. यावर, मग पाकिस्तानातून मतपेट्या आणायच्या का, असा खोचक सवाल त्यांनी केला. मतचोरीचे आरोप करून लोकशाहीवर शंका घेणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राऊतांना लक्ष करत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे चिकटवलेले मुख्यमंत्री नाहीत, त्यांचा इतिहास कच्चा नाही तर पक्का आहे. गेल्या ७० वर्षांत कुणालाही जमले नाही इतके अवाढव्य कार्य महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केले आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, तर राऊत आणि उबाठा गटाचे भविष्य मात्र अंधारात आहे, अशी सणसणीत टीका त्यांनी केली.
‘ब्रँड मोदी’ ‘ब्रँड देवाभाऊ’; बाकीच्यांचा बँड मुंबईकरांनी वाजवला
संजय राऊत उठसूठ ब्रँडच्या गप्पा करतात. पण बेस्टच्या निवडणुकीत ‘ब्रँड’ कोण आणि ‘बँड’ कोणाचा वाजला याचे उत्तर मुंबईकरांनी दिले. भाजपा हाच महाराष्ट्राचा ब्रँड आहे, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस हेच विजयी ब्रँड आहेत. बाकीच्यांचा बँड जनता वेळोवेळी वाजवते असे म्हणत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली.
बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी केले असेल तर ते उबाठा गटाने आणि राऊत यांनीच केल्याचा दावा त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की “काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करीन”. पण आज उबाठा गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. हे बाळासाहेबांना कधीच रुचले नसते. त्यामुळे बाळासाहेबांचा वैचारिक वारसा संपवणाऱ्यांना त्यांच्या नावाने बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही, असा घणाघात त्यांनी केला.
हे ही वाचा :
छत्तीसगड: ५ लाखांची इनामी महिला आणि ७ लाखांचे दोन नक्षलवादी चकमकीत ठार!
सरन्यायाधीश गवई यांनी भगवान विष्णू मूर्तीबाबत केलेल्या विधानावर दिले स्पष्टीकरण; काय म्हणाले?
गडकिल्ले, देवी– देवतांच्या नावाने सुरू असलेल्या बारच्या नावांमध्ये बदल करण्यासाठी उपोषण
“राहुल गांधी भारतात नेपाळसारखी अशांतता निर्माण करू इच्छितात”
भाजपाने अफजल खानाच्या पिलावळीला विरोध केल्यावर मनसेला मिरच्या का झोंबतात?
संदीप देशपांडे यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर देत बन म्हणाले की, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि तो भाजपा- महायुतीचा असेल. मराठी माणसाला भीती दाखवण्याची नाही तर साथ देण्याची गरज आहे आणि ती साथ पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सातत्याने देत आहेत.
मनसेने भीती दाखवण्याचे राजकारण करू नये. देशपांडे यांनी भोंग्याविरोधी आंदोलनावेळी खानाबद्दल वेगळी भूमिका घेतली होती, पण आज भाजपा अफजल खानाच्या पिलावळीला विरोध करतेय तेव्हा मात्र त्यांना मिरच्या झोंबतात. उद्धव ठाकरेंसोबत जाऊन त्यांची वैचारिक सुंता झालेली आहे, त्यामुळे संदीप देशपांडेंनी बोलण्यापूर्वी विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.







