अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालय कधी सुरू होणार? राजेश शर्मांची अवमान याचिका

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप

अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालय कधी सुरू होणार? राजेश शर्मांची अवमान याचिका

अंधेरी (पूर्व) येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) मॉडेल रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून ते निर्धारित मुदतीत सुरू न केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते राजेश शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला असून, या याचिकेवर ११ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.

याचिकेनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०२५ रोजी जनहित याचिका क्रमांक ८/२०२४ निकाली काढताना ईएसआयसीला स्पष्ट मुदत दिली होती. त्यानुसार, १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करून त्याचा ताबा घेणे आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने निश्चित केलेली मुदत संपूनही रुग्णालय अद्याप सुरू झालेले नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

राजेश शर्मा यांनी अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी ईएसआयसी प्रशासनाला ६ फेब्रुवारी २०२६ आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी कायदेशीर नोटिसा पाठवून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची मागणी केली होती. मात्र, नोटिसांनंतरही रुग्णालय सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राजेश शर्मा म्हणाले की, २०१८ मध्ये लागलेल्या भीषण आगीपासून जवळपास आठ वर्षे हजारो विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. हे सार्वजनिक रुग्णालय सुरू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट मुदत निश्चित केली होती. मात्र, ईएसआयसीने ना न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले, ना दिलेली आश्वासने पूर्ण केली. लाखो लाभार्थ्यांच्या हिताशी संबंधित अशा प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक संस्थेला न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करण्याची मुभा देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

छापखान्यातून नव्हे, प्रश्नपत्रिका तयार करतानाच फोडला नीटचा पेपर

सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी ‘इस्लामिक नाटो’?

भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला ‘टॉप गन’

कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याचा मृत्यू

या अवमान याचिकेत न्यायालयाचा अवमान अधिनियम, १९७१ अंतर्गत संबंधित ईएसआयसी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधेरी परिसरातील ईएसआयसी रुग्णालय हे हजारो विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र मानले जाते. २०१८ मधील आगीत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाल्यानंतर ते बंद आहे. त्यानंतर नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असले, तरी न्यायालयाने दिलेल्या मुदतीत ते पूर्ण न झाल्याने आता हे प्रकरण न्यायालयाच्या अवमानापर्यंत पोहोचले आहे.

Exit mobile version