बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील परासी माध्यमिक शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात मीठाऐवजी चुकून डिटर्जंट पावडर दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. हे भोजन खाल्ल्यानंतर किमान ४० विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी बिहार शरीफ येथील मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना नूरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली.
शाळेतील एका शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दिलेले मध्यान्ह भोजन दुसऱ्या शाळेतून पुरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयाबीनच्या भाजीमध्ये मीठ कमी होते. विद्यार्थ्यांनी मीठ मागितल्यानंतर मीठ समजून डिटर्जंट पावडर चुकून देण्यात आल्याचे शिक्षकाने सांगितले. विद्यार्थ्यांनी हे भोजन खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेक मुलांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. विद्यार्थ्यांची संख्या वाढताच शाळा प्रशासनाने तातडीने त्यांना बिहार शरीफ मॉडेल रुग्णालयात नेले.
हे ही वाचा:
जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे
श्रीलंकेत मानव सुथारने रचला विजयसेतू!
संतापजनक! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू
रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. नालंदाचे सिव्हिल सर्जन डॉ. जयप्रकाश सिंह यांच्यासह अनेक डॉक्टर रुग्णालयात उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत होते. डॉ. जयप्रकाश सिंह यांनी सांगितले की, सर्व मुले सुरक्षित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले. आपल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पालक रुग्णालयाबाहेर थांबले होते. विद्यार्थ्यांपैकी एका मुलाने सांगितले की, भोजन केल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि पोटदुखी तसेच उलट्यांचा त्रास सुरू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी रुग्णालयात पोहोचून बाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. “प्रत्येक मुलाला योग्य उपचार मिळतील, याची रुग्णालय प्रशासनाने काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत,” असे श्रवण कुमार यांनी सांगितले. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या घटनेनंतर मध्यान्ह भोजनाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डिटर्जंट पावडर अन्नपदार्थांच्या जवळ कशी ठेवण्यात आली आणि ती मीठाऐवजी विद्यार्थ्यांना कशी देण्यात आली, याचा तपास प्रशासनाकडून केला जाण्याची शक्यता आहे. तसेच भोजन कोणत्या शाळेत तयार करण्यात आले, ते कसे पुरवण्यात आले आणि भोजन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी कोणत्या पद्धतीने केली जाते, याचाही तपास होणार आहे.
