झारखंड राज्यातील पर्यावरण संरक्षक कार्यकर्त्या जमुना टुडू पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जमुना टुडू यांना ‘लेडी टार्झन’ म्हणूनही ओळखले जाते. पर्यावरण रक्षणासाठी आणि जंगलतोड थांबवण्यासाठी त्या कार्य करतात. याच दरम्यान, जमुना टुडू यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आमंत्रण आले आहे. २०२५ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या रात्रीच्या जेवणासाठी जमुना टुडू यांना राष्ट्रपतींनी आमंत्रित केले आहे.
भारतीय टपाल विभागाने एका विशेष व्यवस्थेअंतर्गत नवी दिल्लीहून त्यांना निमंत्रण पत्र पोहोचवले. जमुना टुडू यांना पाठवलेल्या विशेष निमंत्रण पत्रात १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या डिनरला उपस्थित राहायचे आहे असे नमूद केले आहे.
जमुना टुडू काय म्हणाल्या?
राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण मिळाल्यानंतर त्या भावूक झाल्या. त्यांनी या आमंत्रणाचे वर्णन खूप आनंद आणि सन्मान असे केले. त्या म्हणाल्या, “हे आमंत्रण केवळ माझ्यासाठी नाही, तर पर्यावरण वाचवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आणि प्रत्येक गावकऱ्यासाठी आहे. मी भारतीय टपाल विभागाचे मनापासून आभार मानते, ज्यांनी हा सन्मान माझ्या घरी पोहोचवला.”
दरम्यान, १९८० मध्ये ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात जमुना टुडू यांचा जन्म झाला. लग्नानंतर त्या झारखंडला गेल्या आणि येथे होणारी बेकायदेशीर वृक्षतोड पाहून त्यांना खूप दुःख झाले, त्यानंतर त्यांनी ते थांबवण्याचा निर्णय घेतला. वृक्षतोड थांबवणे, वृक्षारोपण, वनसंवर्धन, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. “वन सुरक्षा समिति” (Forest Protection Committee) ची स्थापना देखील त्यांनी केली.
हे ही वाचा :
जेव्हा सचिन टीम इंडियाचा “म्होरक्या” बनला!
अमरावती: ५९ मशिदींवर बेकायदेशीर ‘भोंगे’
मूलनिवासी दिवसाच्या निमित्ताने विभाजनाचा डाव
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार!
जमुना टुडू यांनी हजारो झाडांची लागवड केली आहे आणि त्या झाडांची आईप्रमाणे काळजी घेत आहेत. अवैध वृक्षतोड करणार्यांविरुद्ध संघर्ष केला, त्यासाठी त्यांना धमक्या मिळाल्या, पण त्या मागे हटल्या नाहीत. गावातील महिला सशक्तीकरणाचे उदाहरण म्हणूनही त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. जमुना टुडू यांनी आजवर एकलाखाहून अधिक झाडे लावली आहेत. त्या सायकलवरून जंगलाची देखरेख करतात. झाडांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या आवडीमुळे लोक जमुना टुडू यांना ‘लेडी टार्झन’ म्हणू लागले. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०१७ मध्ये “इंडिया’ज डॉटर” अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.







