पुण्यातील पाषाण-सुतारवाडी परिसरात अण्णा हजारे यांना ‘मतचोरीच्या’ मुद्द्याविरुद्ध ‘जागे’ होण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स लागले आहेत. हे पोस्टर्स समोर आल्यानंतर याची बरीच चर्चा झाली. याच दरम्यान, आता शांत बसलेल्या अण्णा हजारे यांनी यावर भाष्य केले आहे. अण्णा हजारे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि संपूर्ण घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या पोस्टर्समध्ये हजारे झोपलेले असतानाचा फोटो होता. त्यावर त्यांना ‘जागे व्हा’ आणि विरोधकांनी भाजप आणि भारतीय निवडणूक आयोगावर केलेल्या ‘मतचोरीच्या’ आरोपांना उत्तर देण्याचे आवाहन करणारा संदेश होता.
सोशल मीडियावर पोस्टर्सचे व्हिडिओ समोर आल्यानंतर हजारे म्हणाले, “मी या व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी माहितीचा अधिकार (RTI), लोकपाल यांसारखे १० कायदे आणण्यासाठी संघर्ष केला आणि त्यात यशही मिळवलं. आज मात्र मला दु:ख होतं की तरुण पिढी निष्क्रिय झाली आहे आणि माझ्याकडून पुन्हा एखादं आंदोलन उभं करण्याची अपेक्षा करते, तेही वयाच्या ९०व्या वर्षी.”
ते पुढे म्हणाले, “तरुण पिढीने आता पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे. ते देखील देशाचे नागरिक आहेत आणि ती त्यांचीही जबाबदारी आहे. इतरांवर बोटे दाखवून काही साध्य होणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध इतक्या वर्षांच्या लढाईनंतर, आज मला जागे होण्यास सांगितले जात आहे. मला वाईट वाटते.”
दरम्यान, अण्णा हजारेंनी मतचोरीच्या आरोपांवर कोणतीही भूमिका न घेतल्याबद्दल विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रदेश काँग्रेस प्रमुख हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सरकारविरुद्धच्या सध्याच्या मुद्द्यांवर त्यांच्या (हजारे) मौनावर शंका येते.” त्यांनी यूपीएविरुद्ध आंदोलने केली आणि त्यांच्या टीममधील काही सदस्य नंतर मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल बनले. आता, जेव्हा आपल्या देशात लोकशाही वाचवण्यासाठी अनेक आव्हाने आहेत, तेव्हा ते गाढ झोपेत गेले आहेत, असे सपकाळ म्हणाले.
हे ही वाचा :
‘मतदार अधिकार यात्रा’: राहुल गांधींच्या ताफ्याने पोलिसाला चिरडले!
मुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस
मतचोरीचा आरोप केला आणि नंतर मागितली माफी!
मुख्तार अब्बास नकवी यांचा राहुल गांधींवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) नेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षाचे शहर प्रमुख प्रशांत जगताप म्हणाले, “यूपीए सरकारच्या काळात हजारे यांनी देशव्यापी आंदोलन केले होते, परंतु भाजप सरकारचा भाग असताना ते गप्प आहेत. केंद्र सरकार काही मूठभर लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी देशाच्या संपत्तीची विक्री करत आहे आणि ‘मतचोरीत’ सहभागी होत आहे. त्यांच्या मौनामुळे शंका निर्माण झाल्या आहेत, म्हणूनच लोक त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. “







