भारत डिसेंबरमध्ये श्रीलंका महिला क्रिकेट संघाची मेजबानी करणार आहे. दोन्ही देशांच्या महिला टीम्स एकवीस ते तीस डिसेंबरदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत. मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने विशाखापट्टणम येथे, तर उर्वरित तीन सामने तिरुवनंतपुरम येथे होणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार —
-
एकवीस आणि तेवीस डिसेंबर : एसीए–व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
-
सव्वीस, अठ्ठावीस आणि तीस डिसेंबर : ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम
श्रीलंका मालिकेनंतर महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम नऊ जानेवारी ते पाच फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई आणि वडोदरा येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर भारतीय महिला संघ पंधरा फेब्रुवारी ते सहा मार्चदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मल्टी-फॉर्मॅट दौऱ्यासाठी रवाना होईल.
भारतीय महिला संघाने नोव्हेंबरमध्ये आपला पहिला महिला वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्या विजयानंतर भारतीय टीम प्रथमच श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच पुढील वर्षी बारा जून ते पाच जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी ही मालिका महत्वाची मानली जाते.
अलीकडे बांगलादेश महिला संघाचा भारत दौरा राजकीय तणावामुळे स्थगित करण्यात आला. तसेच भारत पुरुष संघाचा बांगलादेश दौरा सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पुढे ढकलण्यात आला. या रिकाम्या स्लॉटमध्ये भारत–श्रीलंका महिला टी-२० मालिकेची भर घालण्यात आली आहे.
२००९ पासून भारत आणि श्रीलंका महिला टीम्समध्ये सव्वीस टी-२० सामने झाले. भारताने यात वीस विजय मिळवले, तर श्रीलंकेने पाच सामने जिंकले आणि एक सामना अपुरा राहिला. आगामी मालिकेत भारत आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.







