कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष ‘नमो एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. कॅबिनेट मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघातील नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी महिनाभरापासून विभागातील सर्व कार्यकर्ते कार्यरत असतात. विशेष म्हणजे या प्रवासासाठी केवळ भाजपा कार्यकर्तेच नाही तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही अतिशय अल्प दरात प्रवेश देण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या सुमारे २ हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली.
मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियेने ही ‘नमो एक्सप्रेस’ कोकणात रवाना करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
“नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आलेले अर्धा डझन ड्रोन दिसले”
ऑपरेशन चक्र-IV अंतर्गत सीबीआयची मोठी कारवाई
गगनयान मोहिमेसाठी एअर ड्रॉप टेस्ट यशस्वी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही विशेष गाडी सोडण्यात आली असून, थेट खेडला पहिला थांबा घेणार आहे. त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या शेवटच्या स्थानकावर थांबणार आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवासाचे तिकीट मिळवताना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा इच्छा असूनही कोकणात गणेश दर्शन घेता येत नाही. मात्र मंत्री लोढा यांनी नमो एक्सप्रेस आयोजित करून अतिशय चांगली सुविधा दिली असल्याचे नागरिकांनी सांगितले.







