आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, ५ जानेवारी रोजी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र डागत ‘आप-दा’ (आपत्ती) आरोपाचा पुनरुच्चार केला. दिल्लीच्या जपानी पार्कमध्ये परिवर्तन रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या राजधानीला विकासाची गरज आहे. ‘आप-दा’ची नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीत कमळ फुलणार आहे. केवळ भाजपच दिल्लीला जगातील सर्वोत्तम राजधानीचा दर्जा देऊ शकतो. दिल्लीतील लोकांची मने जिंकण्याची आणि या ‘आप-दा’ला दिल्लीतून हटवण्याची वेळ आली आहे, असा विश्वासही नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
“दिल्ली सरकारवर गेल्या १० वर्षांत विकास रुळावरून घसरले आहे. दिल्लीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी दिल्लीतील जनतेला भाजपला संधी देण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. दिल्लीचा विकास भाजपच करू शकतो. दिल्लीने गेल्या १० वर्षात ज्या प्रकारचे राज्य सरकार पाहिले आहे ते ‘आप-दा’ पेक्षा कमी नाही आणि हे दिल्लीतील जनतेला आज चांगलेच कळले आहे. आता दिल्लीला विकासाचा प्रवाह हवा आहे आणि मला आनंद आहे की दिल्लीचा भाजपवर विश्वास आहे. भाजपवर हा विश्वास आहे कारण भाजप हा सुशासन आणणारा पक्ष आहे, भाजप हा सेवेच्या भावनेने काम करणारा पक्ष आहे, भाजप स्वप्ने पूर्ण करणारा पक्ष आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“आप-दाच्या लोकांनी दिल्लीतील जनतेची १० वर्षे वाया घालवली याचे मला वाईट वाटते. या सरकारकडे दिल्लीतील जनतेच्या विकासाचे व्हिजन नाही. आजही सर्व विकासकामे, मेट्रो दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे, हे काम केंद्र सरकारने केले आहे. नमो रेल प्रकल्पही केंद्र सरकार उभारत आहे. ज्यांनी आप-दाला दिल्लीत आणले ते खोटे आरोप करतात की केंद्र सरकार त्यांना काम करू देत नाही. केंद्र सरकार त्यांना पैसे देत नाही. ते किती मोठे खोटे आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
हे ही वाचा..
पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात; तीन क्रू मेम्बर्सचा मृत्यू
दिल्लीहून ४० मिनिटांत मेरठ गाठता येणार; दिल्ली- मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन
महाकुंभमेळा परिसरात १० हजारहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा
बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या एका बांगलादेशी व्यक्तीला दिल्लीतून अटक
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “जेव्हा दिल्लीतील जनता कोरोनाशी झुंजत होती, तेव्हा दिल्लीतील लोक ऑक्सिजन आणि औषधांसाठी भटकत होते. त्यावेळी या लोकांचे संपूर्ण लक्ष आपला शीशमहाल बांधण्यावर होते. शीश महालासाठी त्यांनी प्रचंड बजेट केले. हे त्यांचे सत्य आहे, त्यांना दिल्लीतील जनतेची पर्वा नाही,” अशी खोचक टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपने केला आहे, त्यात पडद्यावर एक कोटी रुपये आणि फ्लोअरिंगसाठी सहा कोटी रुपये खर्च केले आहेत.







