सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधामुळे सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर मंगळवारी (९ सप्टेंबर) नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. निदर्शकांवर पोलिसांनी प्राणघातक बळाचा वापर केल्याने किमान २२ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले, ज्यात बहुतेक तरुण “जनरल झेड” चळवळीचे नेतृत्व करत होते. सरकारने बंदी मागे घेतली असूनही, दुसऱ्या दिवशी निदर्शने तीव्र झाली, जमावाने नेपाळी नेत्यांवर हल्ला करून त्यांना दुखापत केली. याच दरम्यान, पंतप्रधान केपी शर्मा ओली हे देश सोडण्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यासह मंत्री मंडळातील मंत्री देखील देश सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुसरी सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये परिस्थिती स्थिर होईपर्यंत भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये प्रवास करण्यापासून सावध केले आहे. सध्या देशात असलेल्या भारतीयांना घरातच राहण्याचे, रस्त्यावर येण्याचे टाळण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या आणि काठमांडूमधील भारतीय दूतावासाच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक देखील शेअर केले आहेत, +९७७–९८० ८६० २८८१ (व्हॉट्सअॅप कॉल ), +९७७–९८१ ०३२ ६१३४ (व्हॉट्सअॅप कॉल ).
काठमांडूमध्ये हिंसाचार भडकत असताना, कालीमाटी येथे पोलिसांच्या गोळीबारात दोन तरुण निदर्शकांचा मृत्यू झाला. यासह, नेपाळमधील निदर्शनातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली. निदर्शकांनी स्थानिक पोलिस चौकीला आग लावली आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केल्यानंतर ही घटना घडली, ज्यामुळे सुरक्षा दलांना प्रत्युत्तर म्हणून गोळीबार करावा लागला.
नेपाळमध्ये जनरल झर्सच्या निषेधाची तीव्रता वाढल्याने एअर इंडियाने मंगळवारी दिल्लीहून काठमांडूला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी, परराष्ट्र मंत्री आरझू राणा देउबा यांच्यावर निदर्शकांनी हल्ला केला. नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना निदर्शकांनी मारहाण केली आहे, याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा :
रशियन बॉम्बिंगमध्ये २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू
काठमांडू विमानतळ बंद; इंडिगो, एअर इंडियाकडून उड्डाणे रद्द
रेल्वे साइडिंगवर अंधाधुंध गोळीबार
‘द बंगाल फाइल्स’च्या स्क्रीनिंगमध्ये अडथळा
दरम्यान, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचे आवाहन करणारे संदेश जनरल झेड निदर्शकांमध्ये वेगाने फिरत आहेत. त्यामुळे पुढील पंतप्रधान बालेंद्र शाह असतील अशी चर्चा होत आहे.







