दिल्लीतील जंतर-मंतर येथील कॉकरोच जनता पार्टी (CJP) आंदोलनादरम्यान संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चावरून निर्माण झालेल्या वादावर दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलनकर्त्यांवर विनाकारण कारवाई केल्याचे आरोप फेटाळून लावत, जंतर-मंतर येथे केवळ धरणे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती, संसद भवनाकडे मोर्चा काढण्याची कोणतीही परवानगी दिली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी सांगितले की, आंदोलन आयोजकांना सुरुवातीपासूनच जंतर-मंतर परिसरातच आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, २० जुलै रोजी काही आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसद परिसराची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना अडवले. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा आणि सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कोणताही विनाकारण लाठीमार किंवा बळाचा वापर केल्याचा आरोपही नाकारला आहे. आंदोलकांना वारंवार शांततेने मागे फिरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, बॅरिकेड्सचे नुकसान केले आणि सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. त्यानंतरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.
हे ही वाचा:
“अल्लाहने आदेश दिला” म्हणत तीन महिलांवर चाकूहल्ला
कीर्तनकार, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या क्रांतिगीता ताई महाबळ यांचे निधन
‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम
ब्रांझपदकविजेत्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारला १० लाखांचे इनाम
या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. हिंसाचारानंतर ७० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे परीक्षण सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
