जपानमध्ये मंगळवारी (२८ जुलै) झालेल्या ७.१ रिश्टर तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. क्युशू बेटावरील कुमामोटो प्रीफेक्चरमध्ये हा भूकंप झाला. जपान हवामान विभागाच्या (JMA) माहितीनुसार, भूकंपाची कमाल तीव्रता ‘शिंदो ७’ इतकी नोंदवण्यात आली, जी या मापन प्रणालीतील सर्वोच्च पातळी आहे. या भूकंपाचे धक्के शेजारील दक्षिण कोरियातही जाणवले.
जेएमएने अरियाके आणि यात्सुशिरो समुद्रकिनारी भागांसाठी सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, भूकंपानंतर काही वेळातच या भागात सुनामीची पहिली लाट धडकण्याची शक्यता होती. त्यानंतर आणखी लाटा येण्याचाही इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक तीव्र धक्के यात्सुशिरो, उतो शहर, माशिकी, मिसातो आणि कुमामोटो शहरातील मिनामी वॉर्ड येथे जाणवले. या भागांमध्ये जपानी शिंदो स्केलवर ६ इतकी तीव्रता नोंदवण्यात आली.
क्योडो वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कुमामोटोसह शेजारच्या नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा आणि मियाझाकी प्रीफेक्चरमध्येही जोरदार धक्के जाणवले. या भागांमध्ये भूकंपाची तीव्रता जपानी मापन प्रणालीवर ५ किंवा त्याहून अधिक होती. जपान हवामान विभागाने सांगितले की, भूकंपाचे केंद्र उकी शहराजवळ असून त्याची खोली सुमारे १० किलोमीटर होती. भूकंपामुळे कुमामोटो प्रीफेक्चरमधील सुमारे ४५,६०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. स्थानिक वीज कंपनी क्युशू इलेक्ट्रिक प्रभावित भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत आहे.
हे ही वाचा:
बेबी पावडर वादावर जॉन्सन अँड जॉन्सनचा ५.५ अब्ज डॉलरच्या तडजोडीचा प्रस्ताव
हॉटेलातील पार्टीवरून वांगचुक यांनी कोक्रॉचना सुनावले
अल्पवयीन विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची तात्काळ सुटका करा
संपत्ती वाढली, पण सल्लागार कमी! भारतासमोर नवे आर्थिक आव्हान
हा भूकंप २०१६ मध्ये कुमामोटो येथे झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या जवळपास दहा वर्षांनंतर झाला आहे. एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या दोन मोठ्या भूकंपांत २७८ जणांचा मृत्यू, तर सुमारे २,८०० जण जखमी झाले होते. त्या आपत्तीत ऐतिहासिक कुमामोटो किल्ल्याचे मोठे नुकसान झाले होते. या किल्ल्याचे पुनर्बांधणीचे काम २०५२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, या भूकंपाचे धक्के दक्षिण कोरियातील काही भागांमध्येही जाणवले. योनहाप वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्वेकडील बुसान शहरात भूकंप जाणवल्याबाबत १५७ फोन कॉल प्रशासनाला प्राप्त झाले. अनेक नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.
