पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राझीलच्या दौऱ्यावर असून त्यांना तेथील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. ब्राझील सरकारने मंगळवारी त्यांना आपल्या अधिकृत राजकीय भेटीदरम्यान ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले. हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील २६वा सन्मान आहे आणि २ जुलैपासून सुरू झालेल्या पाच देशांच्या दौऱ्यात मिळालेला तिसरा आंतरराष्ट्रीय गौरव आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ब्रासीलिया येथे भारत-ब्राझील संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, “रिओ आणि ब्रासीलिया येथे दिलेल्या मनःपूर्वक स्वागतासाठी मी माझे मित्र, राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचे मन:पूर्वक आभार मानतो. अमेझॉनचे नैसर्गिक सौंदर्य आणि तुमचे आतिथ्य दोन्ही मंत्रमुग्ध करणारे आहे. ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मला प्रदान केला जाणे केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचे आणि भावूकतेने भरलेले क्षण आहे. मी यासाठी राष्ट्रपती लुला यांचे, ब्राझील सरकारचे आणि ब्राझीलच्या जनतेचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो.”
हेही वाचा..
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती लुला यांच्यात व्यापार व गुंतवणुकीवर चर्चा
चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येणे धोकादायक – सीडीएस अनिल चौहान
आंदोलकांना ‘शोधा आणि गोळ्या’ घाला!
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची 77 लाखांनी फसवणूक
ते पुढे म्हणाले, “आजच्या चर्चेत आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या महत्त्वावर भर दिला. येत्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आपण निश्चित केले आहे. फुटबॉल ब्राझीलचा आणि क्रिकेट भारताचा जणू श्वास आहे. चेंडू सीमारेषेपार जावा वा गोलमध्ये जावा, जेव्हा दोन्ही एकाच संघात असतात, तेव्हा २० अब्ज डॉलरची भागीदारीही कठीण वाटत नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऊर्जा क्षेत्रात आमचे सहकार्य सातत्याने वाढत आहे. पर्यावरण आणि स्वच्छ उर्जा हे दोन्ही देशांचे प्रमुख प्राधान्यक्रम आहेत. याच क्षेत्रात आज झालेला करार आमच्या ‘ग्रीन गोल’ना नव्या दिशा आणि गती देईल. संरक्षण क्षेत्रातील वाढते सहकार्य हे आमच्या परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. आम्ही आमचे संरक्षण उद्योग एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करत राहू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सुपर कॉम्प्युटिंगमध्ये आमचे सहकार्य वाढत आहे, जे समावेशक विकास आणि माणूस-केंद्रित नवोपक्रमाच्या आमच्या समान दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.”
ते म्हणाले, “ब्राझीलमध्ये यूपीआय स्वीकारण्यास दोन्ही बाजूंचे सहकार्य सुरू आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि अवकाश संशोधन या क्षेत्रातील आमची पारंगतता आणि अंतर्दृष्टी शेअर करण्यास आम्हाला आनंद होईल. कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील आमचे सहकार्य दशकांपासून आहे. आता आपण कृषी संशोधन व अन्न प्रक्रिया यावरही संयुक्तपणे काम करणार आहोत. आज जेव्हा जग तणाव आणि अनिश्चिततेच्या कालखंडातून जात आहे, तेव्हा भारत-ब्राझीलची ही भागीदारी स्थैर्य व समतोलाचा एक महत्त्वाचा आधार आहे. सर्व वादांचे निराकरण संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच व्हावे, यावर आपण एकमत आहोत.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आतंकवादाविरुद्धच्या लढ्यात आमचे विचार एकसमान आहेत – शून्य सहनशीलता आणि शून्य दुटप्पीपणा. आमचे स्पष्ट मत आहे की, आतंकवादासंदर्भात कोणत्याही प्रकारचा दुहेरी निकष स्वीकारला जाणार नाही. आम्ही आतंकवाद आणि त्याला आश्रय देणाऱ्यांचा तीव्र निषेध करतो.”







