पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी आसाममधील डिब्रूगढ जिल्ह्यातील मोरान बायपास येथे नॉर्थ-ईस्टमधील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधा (इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी- ELF) चे उद्घाटन केले. सुमारे १०० कोटी खर्चून ही योजना विकसित करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींच्या दिवसभराच्या आसाम दौऱ्यात राज्यातील ५,५०० कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचाही शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान सकाळी चाबुआ एअरफिल्ड येथे पोहोचले. त्यांचे स्वागत आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर पंतप्रधान भारतीय वायुदलाच्या C- 130 परिवहन विमानातून मोरान बायपास येथील ELF कडे रवाना झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ४.२ किलोमीटर लांबीची ही सुविधा नॉर्थ- ईस्ट प्रदेशातील अशा प्रकारातील पहिलीच योजना आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेऊन ती विकसित करण्यात आली आहे. या आपत्कालीन लँडिंग सुविधेमुळे वायुदलाच्या लढाऊ आणि परिवहन विमानांना सुरक्षित लँडिंग आणि टेक- ऑफ करता येणार असून आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या लष्करी आणि मदत मोहिमांना मोठी मदत होणार आहे. प्रादेशिक संपर्क आणि सामरिक सज्जतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प मानले जात आहे.
उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी भारतीय वायुदलाच्या सुमारे ४० मिनिटांच्या विशेष एरियल शो चाही आनंद घेतला. या प्रात्यक्षिकात लढाऊ विमाने, परिवहन विमाने आणि हेलिकॉप्टरचा सहभाग होता. या माध्यमातून परिचालन क्षमता आणि समन्वयाचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि नागरी प्रशासन व संरक्षण दलांमध्ये प्रभावी समन्वय दिसून आला.
हे ही वाचा:
“शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी राहुल गांधींचे खोटे कथानक”
मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवेवरून झारखंडमध्ये पाच साधूंना मारहाण
कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकणारा २२ वर्षीय भारतीय विद्यार्थी बेपत्ता
पचनसंस्थेसाठी फायदेशीर तंतुमय हिरवा चणा, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून देतो आराम
दिवसभराच्या उर्वरित कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी आसाममधील पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था आणि सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित ५,५०० कोटींहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक, औद्योगिक विकास आणि जनकल्याण सेवांना गती मिळणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमांमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि नॉर्थ-ईस्ट प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल. कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी त्याच C- 130 विमानातून ELF वरून उड्डाण करून गुवाहाटीकडे प्रस्थान केले.







