राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी अहमदनगरच्या घटनेबद्दल व्यक्त केले दुःख!

राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी अहमदनगरच्या घटनेबद्दल व्यक्त केले दुःख!

अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेबद्दलच्या शोकसंदेशात म्हटले आहे की, अहमदनगर, महाराष्ट्रातील सिव्हिल रुग्णालयात लागलेल्या आगीत काही लोकांचा मृत्यू ओढवला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. त्यात जखमी झालेल्यांना तातडीने सर्वप्रकारची मदत मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रुग्णालयात आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या घटनेमुळे मी दुःखी आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींना त्वरित उपचार मिळावेत, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.

गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात ट्विट करत घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या घटनेमुळे मी व्यथित आहे. दुःखाच्या या प्रसंगात मी त्या दुर्दैवी कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. या घटनेतील जखमींची प्रकृती लवकर बरी होवो, अशी मी इश्वराकडे प्रार्थना करतो.

हे ही वाचा:

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बदल्यांचे रॅकेट चालवणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटीलच आर्यन खान प्रकरणातील मास्टरमाईंड

कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त

 

अहमदनगर येथील या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील १० जण होरपळून मृत्युमुखी पडले. ऐन दिवाळीत अशी घटना घडल्यामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यात अशा घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. प्रशासकीय पातळीवरील हेळसांड, दिरंगाई याची पुनरावृत्ती होत असल्यामुळे जनमानसात प्रचंड नाराजी आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

Exit mobile version