भारतातील सर्वात दुर्मिळ आणि देखणा मानला जाणारा गोडावण (Great Indian Bustard – GIB) पक्षी आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हवामान बदल, अधिवासाचा ऱ्हास, शिकारी आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे या पक्ष्याच्या अस्तित्वावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (IUCN) गोडावणला ‘अत्यंत संकटग्रस्त’ (Critically Endangered) प्रजाती म्हणून घोषित केले आहे.
गोडावण हा जगातील सर्वात जड उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक मानला जातो. राजस्थानमध्ये तो ‘सोन चिरैया’ तर काही भागांत ‘हुकना’ म्हणून ओळखला जातो. राजस्थानचा राज्यपक्षी असलेला हा पक्षी प्रामुख्याने थार वाळवंट आणि डेजर्ट नॅशनल पार्क परिसरात आढळतो. भारतासह पाकिस्तानच्या काही वाळवंटी भागांमध्येही त्याचे अस्तित्व आहे.
गेल्या काही वर्षांत गोडावणच्या संरक्षणासाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट GIB’ अंतर्गत राजस्थानमध्ये संवर्धन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मार्च २०२६ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रांमधील गोडावणांची संख्या ७३ वर पोहोचली असून त्यामध्ये नव्याने जन्मलेल्या पाच पिल्लांचाही समावेश आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्येही या पक्ष्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेथे ‘भखर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्यासाठी चोलिस्तान वाळवंट परिसरात नवीन अभयारण्ये उभारण्यात आली आहेत. शिकारीवर बंदी घालण्यात आली असून स्थानिक समुदायांच्या सहभागातून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पक्ष्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एकेकाळी शेकड्यांमध्ये असलेली गोडावणची संख्या आता अत्यंत कमी झाली आहे. २०११ मध्ये जगभरात सुमारे २५० गोडावण होते. मात्र २०१८ पर्यंत ही संख्या अवघ्या १५० पर्यंत घसरली. त्यामुळे या पक्ष्याचे संरक्षण ही आता केवळ पर्यावरणीय नव्हे तर राष्ट्रीय जबाबदारी बनली आहे.
याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील कच्छ येथे एक महत्त्वाकांक्षी संवर्धन प्रयोग राबवण्यात आला. तेथे केवळ तीन मादी गोडावण उरल्या असल्याने राजस्थानमधील सॅम संवर्धन केंद्रातून एक अंडे निवडण्यात आले. हे अंडे पोर्टेबल इनक्युबेटरमध्ये ठेवून तब्बल ७७० किलोमीटर आणि १९ तासांचा प्रवास करून २१ मार्च २०२६ रोजी नालिया येथे आणण्यात आले. ‘जंपस्टार्ट’ किंवा ‘सरोगेट प्रजनन’ तंत्रज्ञानाचा वापर करून हे अंडे एका मादी गोडावणाच्या घरट्यात ठेवण्यात आले. २६ मार्च रोजी त्यातून पिल्लाचा जन्म झाला आणि भारतीय वन्यजीव संवर्धन क्षेत्रात हा एक ऐतिहासिक क्षण मानला गेला.
या पिल्लाच्या सुरक्षेसाठी गुजरात वन विभागाने तब्बल ५० सुरक्षा रक्षक तैनात केले होते. निरीक्षण मनोरे, २४ तास देखरेख आणि विशेष सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र १८ एप्रिलनंतर अचानक हे पिल्लू आणि त्याची आई दोघेही बेपत्ता झाले. वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, कुत्रे, कोल्हे किंवा जंगली मांजर यांसारख्या शिकारी प्राण्यांनी पिल्लावर हल्ला केला असावा. अद्याप कोणतेही अवशेष सापडले नसले तरी पिल्लू जिवंत असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन
पुणे बनावट दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर
पावसाच्या सरींसह मान्सूनचा श्रीगणेशा; केरळमध्ये आगमन
ट्रम्प यांना राजकीय धक्का; इराणविरोधी युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर
वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ एम. के. रणजीतसिंह यांच्या मते, गोडावण ही भारताची राष्ट्रीय वारसा प्रजाती आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, हा प्रयोग भविष्यासाठी क्रांतिकारी ठरू शकला असता; मात्र सुरुवातीलाच आलेले हे अपयश निराशाजनक आहे. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. सुमित डुकिया यांनीही याबाबत खंत व्यक्त केली. त्यांच्या मते, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर जन्माला आलेले हे पिल्लू गमावणे दुर्दैवी आहे. नैसर्गिक परिसंस्थेत लहान वयातील गोडावण पिल्लांचा मृत्यूदर खूप जास्त असतो आणि या भागात अनेक मांसाहारी प्राणी सक्रिय असल्याने धोका अधिक वाढतो.
तथापि, या घटनेनंतरही संवर्धन कार्यक्रमाला अपयशी म्हणता येणार नाही. कारण ‘ऑपरेशन एग ट्रान्सफर’मुळे राज्यांच्या सीमा ओलांडून सरोगेट प्रजननासारखी गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवता येते, हे सिद्ध झाले आहे. तसेच गुजरातमधील केवळ मादी पक्ष्यांच्या उरलेल्या लोकसंख्येची जैविक मर्यादाही या प्रयोगामुळे ओलांडण्यात यश आले आहे.
गोडावणच्या अस्तित्वासाठीची ही लढाई अजून संपलेली नाही. मात्र या दुर्मिळ पक्ष्याचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण वैज्ञानिक प्रयत्न, प्रभावी संवर्धन धोरणे आणि लोकसहभाग यांची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
