८.४३ वाजता विमान उतरवण्याला परवानगी आणि ८.४४ वाजता दिसल्या आगीच्या ज्वाळा

अजित पवार विमान अपघातातील घटनांचा तपशील

८.४३ वाजता विमान उतरवण्याला परवानगी आणि ८.४४ वाजता दिसल्या आगीच्या ज्वाळा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य चार जणांचा जीव घेणाऱ्या बारामती विमान अपघाताबाबत सरकारने बुधवारी अधिकृत निवेदन जारी करत संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर तपशील दिला आहे. या संबंधीचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानाला रनवे ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी दिल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून कोणताही रीडबॅक मिळाला नाही आणि पुढच्याच मिनिटाला रनवेच्या जवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या.

बुधवारी (२८ जानेवारी) अजित पवार यांना घेऊन जाणारे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. याआधी एकदा लँडिंगचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर विमानाला पुन्हा रनवे ११ वर उतरण्याची मंजुरी देण्यात आली होती. ही परवानगी सकाळी ८.४३ वाजता देण्यात आली. मात्र, त्यानंतर पायलटकडून ATC ला लँडिंग क्लीअरन्सचा कोणताही रीडबॅक मिळाला नाही. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अगदी एक मिनिटानंतर, म्हणजेच ८.४४ वाजता, ATC कर्मचाऱ्यांना रनवे ११ जवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या.

तसेच हे ही स्पष्ट करण्यात आले आहे की, संपूर्ण घटनाक्रमात एक महत्त्वाची बाब म्हणजे अपघात होण्यापूर्वी ATC कडे कोणताही MAYDAY कॉल आला नाही, तसेच कोणत्याही प्रकारचा आपत्कालीन किंवा संकटाचा संदेशही पाठवण्यात आलेला नव्हता. अपघाताच्या कारणांची चौकशी आता Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडे सोपवण्यात आली आहे.

संबंधित विमान (नोंदणी क्रमांक VI-SSK) ने सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामती ATC शी संपर्क साधला. त्यानंतर विमान बारामतीपासून ३० नॉटिकल मैल अंतरावर असताना त्याने पुन्हा कॉल केला आणि पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आले. पायलटला दृश्य हवामान परिस्थितीत (Visual Meteorological Conditions) स्वतःच्या विवेकाने खाली उतरण्याचा सल्ला देण्यात आला. क्रूने वाऱ्यांची स्थिती आणि दृश्यतेबाबत माहिती विचारली असता ATC ने वारे शांत असल्याचे आणि दृश्यता सुमारे ३००० मीटर असल्याचे सांगितले. त्यानंतर विमानाने रनवे ११ च्या फायनल अप्रोचवर असल्याची माहिती दिली. मात्र, क्रूने रनवे दिसत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात ‘गो-अराउंड’ करण्यात आला.

गो-अराउंडनंतर ATC ने विमानाची स्थिती विचारली. क्रूने पुन्हा रनवे ११ च्या फायनल अप्रोचवर असल्याचे सांगितले आणि रनवे दिसताच कळवू असे नमूद केले. “रनवे सध्या दिसत नाही, दिसताच कळवतो,” असे क्रूने सांगितले. काही सेकंदांनी त्यांनी ATC ला कळवले की आता रनवे दिसत आहे. यानंतर सकाळी ८.४३ वाजता विमानाला रनवे ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या क्लीअरन्सला कोणताही रीडबॅक मिळाला नाही. पुढच्याच मिनिटाला ATC ला रनवेच्या जवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. त्यानंतर आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या विमानाचा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम

“मोठा भाऊ गेला… अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान”

“दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला…”

मुंबई- नवी मुंबई दोन्ही विमानतळे जोडणाऱ्या ‘मेट्रो लाईन- ८’ ची घोषणा!

दरम्यान, VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation म्हणून कार्यरत) चे डायरेक्टर आणि मालक विजय कुमार सिंह यांनी सांगितले, “…हा पायलटचा निर्णय होता. त्याने रनवे २९ वरून अप्रोच घेतला आणि नंतर मिस अप्रोच केला. त्यानंतर त्याने रनवे ११ वरून पुन्हा प्रयत्न केला. माझा पायलटांशी कोणताही संपर्क नाही; ते आता आपल्या सोबत नाहीत. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय होता. आम्हाला याचे फार दुःख आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्या कुटुंबांच्या सोबत उभे राहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुख्यत्वे असे दिसते की पायलटला रनवे दिसत नव्हता. ते अतिशय अनुभवी पायलट होते, त्यांना १६,००० तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता. को-पायलटलाही १,५०० तासांचा अनुभव होता. कॅप्टन खूप अनुभवी होते. ते सहारा, जेटलाइट, जेट एअरवेजसोबत काम केलेले होते आणि अशा प्रकारच्या विमानाचा त्यांना मोठा अनुभव होता. विमान अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले होते. आमच्या माहितीनुसार विमानात कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हती. तपास यंत्रणा आता अपघाताच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी करत आहेत.

Exit mobile version