उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात शुक्रवारी (२९ मे) पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. बेतवा नदीवर उभारण्यात येत असलेला बांधकामाधीन पूल अचानक कोसळल्याने किमान सहा मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.
ही दुर्घटना हमीरपूर जिल्ह्यातील मोराकांदर आणि कंदौर गावांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलावर रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाचा एक भाग अचानक कोसळला आणि त्याखाली अनेक मजूर दबले गेले. काही मजूर पुलाच्या स्लॅबवरच झोपले होते, त्याच वेळी संपूर्ण संरचना अचानक कोसळल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवरील झालेली ही दुर्घटना अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जिल्हा प्रशासनाला SDRFच्या समन्वयाने मदत आणि बचावकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना आहे की, दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि जखमींना लवकर बरे वाटो.”
मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून बचावकार्य गतीने करण्याचे आदेश दिले. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्यात यावेत आणि मृतांच्या नातेवाईकांना योग्य आर्थिक मदत देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. हमीरपूरचे अपर पोलिस अधीक्षक अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितले की, रात्री सुमारे २ वाजता घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले, “पुलाचा एक स्लॅब कोसळल्याची आणि काही लोक त्याखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. SDRFची टीम घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.”
हे ही वाचा:
पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुने १३ दगावले
तेलवाहू जहाजाने ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी; ३ जूनला विशाखापट्टणममध्ये पोहचणार
नाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट
घरात एसीचा स्फोट होऊन स्पर्धा आयोगाचे पहिले प्रमुख, धनेंद्र कुमार दगावले
मात्र, नंतर मृतांचा आकडा वाढून सहा झाला. प्रशासनाला अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे. त्यामुळे SDRF, स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमकडून शोध आणि बचाव मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर बांधकामातील सुरक्षा नियम आणि खराब हवामानात घेण्यात आलेल्या खबरदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या खराब हवामानात मजुरांना बांधकामस्थळी का ठेवण्यात आले होते, याबाबत स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षा कवचात घेण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
