ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. त्यांच्या या वक्तव्यांमुळे आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम ४९९ (मानहानी), ५०० (बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जावेद अख्तरांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने बदनामीकारक काल्पनिक विधाने केल्या प्रकरणी जावेद अख्तरांवर फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दलची वस्तुस्थिती लक्षात येईल, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले होते.
हे ही वाचा:
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा
काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच
करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग
१६ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. दुबे यांनी यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. गेल्या महिन्यात दुबे यांनी अख्तर यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते.