इंधन आयात कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्याचे सरकारचे धोरण असले तरी अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज मिळवणे हे आव्हान असल्याचे मत महिंद्रा इलेक्ट्रिकचे सी.ई.ओ महेश बाबू यांनी अलिकडेच व्यक्त केले आहे.
आम्ही आमच्याकडील २५० दशलक्ष किमी वापरल्या गेलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या डेटाचा वापर करुन बॅंका आणि इतर पतपुरवठादारांना याबाबत मदत देऊ शकतो.
महिंद्रा इलेक्ट्रिकचे सी.ई.ओ महेश बाबू यांनी बिझनेस लाईन या वृत्तपत्राशी साधलेल्या संवादात, इलेक्ट्रिक वाहनांची आर्थिक बाजू, ग्राहकांचा कल, इलेक्ट्रिक वाहनांची गरज यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की यापूर्वी महिंद्रा कधीच तीन-चाकी वाहनांच्या क्षेत्रात नव्हती. मात्र इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांच्या रुपाने आम्हाला नवे क्षेत्र खुले झाले आहे. तीन चाकी वाहने महिलांमध्ये अधिकाधीक लोकप्रिय होत असल्याचे त्यांनी नमुद केले, सोबतच यामुळे एकूण घरगुती उत्पन्नात प्रति महिना ४,०००-५,००० रुपयांची वाढ झाल्याची टिपणी देखील त्यांनी केली. महिंद्राने दहा वर्षांपूर्वीच e20 ही इलेक्ट्रिक गाडी बाजारात आणली होती. आता महिंद्रा इलेक्ट्रिक, आत्मनिर्भर भारत योजनेच्या अनुषंगाने आपला विस्तार करू इच्छित असल्याचे याच संवादातून समजते.
इलेक्ट्रिक वाहनांसोबतच, महिंद्रा त्यांच्या नव्या Treo Zor वाहनासमवेत ऑनलाईन किरकोळ बाजारातील मोठ्या कंपन्यांसोबत जोडू इच्छित असलेले संबंध, बाजारातील खरेदी कल, कोरोना साथीचा वाहन उद्योगावर झालेला परिणाम यावरही महेश बाबू यांनी भाष्य केले.