‘बुलेट’ वेगाने धावणार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था!

रोजगार आणि गुंतवणुकीला मिळणार नवी सुपरफास्ट गती

‘बुलेट’ वेगाने धावणार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता देशातील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक म्हणून वेगाने पुढे जात असून, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरत आहे. भारतातील पहिली हाय-स्पीड रेल्वे सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, रोजगार आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी आर्थिक क्रांती घडण्याची चिन्हे दिसत आहेत. ताशी तब्बल ३२० किलोमीटर वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे सुमारे ५०८ किलोमीटरचे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन मुंबई आणि गुजरातमधील व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानने लक्ष्य केल्याचा दावा केलेले ‘भारतीय एअरबेस’ अस्तित्वातच नाहीत

मालवणीत अस्लम शेख पुत्राचा हिंदूंना त्रास, कुटुंबाच्या दरवाजासमोर अनधिकृत बांधकाम

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी केजरीवालांसह ‘आप’च्या सहा नेत्यांना नोटीस

“अमेरिकेकडून सूट मिळो अथवा न मिळो, भारत रशियन तेल खरेदी करणार”

महाराष्ट्रात या मार्गावर मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर अशी चार महत्त्वाची स्थानके उभारली जात आहेत. विशेषतः ठाणे, विरार आणि बोईसर परिसरात या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक घडामोडी वाढण्याची अपेक्षा आहे. रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, हॉटेल व्यवसाय, किरकोळ व्यापार आणि सेवा उद्योगांना यामुळे मोठी चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात नव्या व्यावसायिक संकुलांची निर्मिती, आधुनिक टाउनशिप आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे १.०८ लाख कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी आतापर्यंत जवळपास ७८ हजार ८३९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या बांधकामामुळे हजारो अभियंते, तंत्रज्ञ, कामगार आणि लघुउद्योगांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. स्टील, सिमेंट, विद्युत उपकरणे, बांधकाम साहित्य आणि वाहतूक क्षेत्रातही मोठी आर्थिक उलाढाल निर्माण झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ रेल्वेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारा ठरत आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये जपानच्या अत्याधुनिक शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. भारत आणि जपान यांच्या सहकार्याने उभारला जाणारा हा प्रकल्प देशाच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतीक मानला जात आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण १२ स्थानके असतील. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात एक वेगवान आर्थिक कॉरिडॉर तयार होणार असून उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे.

या प्रकल्पातील सर्वात विशेष बाब म्हणजे मुंबईतील २१ किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा. त्यापैकी सुमारे ७ किलोमीटरचा भाग समुद्राखालून जाणार आहे. भारतातील हा पहिलाच अंडरसी रेल्वे बोगदा असणार आहे. या कामासाठी तब्बल १३.६ मीटर व्यासाच्या आणि सुमारे ३ हजार टन वजनाच्या विशाल टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जात आहे. यामुळे भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत आहे.

प्रकल्पाच्या कामातही मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३२३ किलोमीटर व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १७ नदी पूल आणि अनेक स्टील ब्रिज उभारण्यात आले आहेत. ५ हजार ४०० हून अधिक ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मस्त बसवण्यात आले आहेत. गुजरातमधील अनेक स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर येथेही वेगाने बांधकाम सुरू आहे.

बुलेट ट्रेन स्थानकांभोवती आधुनिक “स्टेशन प्लाझा” विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यात मेट्रो, बस, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असून स्थानिक व्यापार आणि व्यवसायालाही मोठी चालना मिळेल.

एकूणच, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा केवळ वेगवान प्रवासाचा पर्याय नसून महाराष्ट्राच्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकास यांच्या जोरावर हा प्रकल्प भारताच्या आर्थिक प्रगतीचा नवा चेहरा बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version