देशभरात एकीकडे भीषण उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भासह अनेक भागांमध्ये तापमान चाळिशीपार गेले असून उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. काही भागांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
सेन्सेक्स-निफ्टी दबावात, IT शेअर्सची दमदार मुसंडी
मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का, क्विंटन डी कॉक आणि राज अंगद बावा उर्वरित सामन्यांतून बाहेर
सप्टेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन येणार भारत दौऱ्यावर
सोनं पुन्हा तेजीत, चांदीत घसरण
मात्र या उकाड्याच्या वातावरणातच बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातही दुहेरी परिस्थिती पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा प्रकोप कायम असताना कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्री-मान्सून हालचालींना वेग आला असून वातावरणात मोठे बदल होत आहेत. अंदमान-निकोबार परिसरात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
हवामान खात्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वादळी पावसाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये, विजांच्या कडकडाटापासून सावध राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
