पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी देशवासीयांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि त्यातून परकीय चलन साठ्यावर निर्माण होणारा ताण लक्षात घेऊन भारताचे आयात बिल कमी करण्याच्या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले होते. भारत आपल्या गरजेपैकी ९० टक्क्यांहून अधिक सोने आयात करतो. त्यामुळे सोन्यावरील आयात कमी झाल्यास डॉलरची बचत होईल, व्यापार तूट कमी होईल आणि रुपयावरील दबावही घटेल, असा सरकारचा उद्देश होता. या पार्श्वभूमीवर सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केली आणि ग्राहकांनी काही काळ सोने खरेदी टाळावी, असे आवाहन केले.
मात्र प्रत्यक्षात भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेवर या आवाहनाचा दीर्घकालीन परिणाम झालेला दिसत नाही. सुरुवातीच्या काही आठवड्यांत विक्रमी दरांमुळे आणि सरकारी आवाहनामुळे सोन्याच्या विक्रीत काहीशी मंदी आली. परंतु गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीने बाजाराचे चित्र बदलले आहे. सोन्याचे दर विक्रमी पातळीवरून सुमारे ₹३,००० प्रति १० ग्रॅम घसरले आहेत, तर चांदीही ₹७,००० हून अधिक प्रति किलो स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी ही घसरण ‘खरेदीची सुवर्णसंधी’ म्हणून स्वीकारली असून सराफा बाजारात पुन्हा गर्दी वाढू लागली आहे.
हे ही वाचा:
‘विक्रम-1’ झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व
महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांचे निधन
वांगचुक यांना हटवल्यानंतर अभिजीत दिपके आमरण उपोषणावर
दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेले रुग्णालयात
१८ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹१,४०,९९६ प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२९,१५२ प्रति १० ग्रॅम होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्ट वायदा सोन्याचा भाव ₹१,४०,७२५ प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा भाव ₹२,१५,४४० प्रति किलो नोंदविण्यात आला. दरांमध्ये आलेली ही घसरण आणि स्थिरता यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदीचे नियोजन पुढे ढकलण्याऐवजी लगेचच दागिने आणि सोन्याच्या नाण्यांची खरेदी सुरू केली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) ताज्या अहवालानुसार, सुरुवातीच्या मंदीनंतर भारतातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी पुन्हा वाढत आहे. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि आगामी विवाह हंगाम लक्षात घेऊन ज्वेलर्सकडे नवीन ऑर्डर्स वाढू लागल्या आहेत. अनेक सराफांनी मेकिंग चार्जमध्ये सवलत, जुन्या सोन्याची अदलाबदल आणि हप्त्यांवरील खरेदी योजना सुरू केल्याने ग्राहकांचा प्रतिसाद आणखी वाढला आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश असून दरवर्षी ७०० ते ८०० टन सोन्याची मागणी असते. देशांतर्गत उत्पादन अत्यल्प असल्याने बहुतांश सोने आयात करावे लागते. त्यामुळे सरकार आर्थिक दृष्टिकोनातून सोन्याची आयात कमी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी भारतीयांसाठी सोने ही केवळ गुंतवणूक नसून परंपरा, सुरक्षित बचत आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. विवाह, सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सोन्याला विशेष महत्त्व असल्याने किंमती वाढल्या तरी खरेदी पूर्णपणे थांबत नाही. उलट दर कमी झाले की ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारात परततात.
