इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतासाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. इराणने “मित्र देश” म्हणून भारताला दिलेल्या सवलतीमुळे भारताकडे येणाऱ्या एलपीजी (LPG) टँकर्सना सुरक्षित मार्ग मिळू लागला आहे.
अहवालानुसार, भारताकडे येणारे दोन एलपीजी टँकर्स – BW Elm आणि BW Tyr – यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली आहे. या टँकर्सनी अत्यंत संवेदनशील आणि युद्धग्रस्त मार्गातून सुरक्षितपणे प्रवास करत ओमानच्या आखाताकडे वाटचाल सुरू केली आहे. ही घडामोड भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंदच झाली होती. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅस पुरवठा होतो. भारताच्या एलपीजी आयातीपैकी सुमारे 90% पुरवठा याच मार्गावर अवलंबून आहे.
हे ही वाचा:
भारताकडे येणाऱ्या दोन एलपीजी टँकर्सनी होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली
१ एप्रिलपासून रशियाची पेट्रोल निर्यात बंद
राजस्थानच्या जोधपुरमध्ये मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक
एलपीजी पुरवठ्यात वाढ; स्टील, ऑटो आणि केमिकल्स उद्योगांना मोठा दिलासा
इराणने स्पष्ट केले आहे की “non-hostile” म्हणजेच शत्रुत्व नसलेल्या देशांच्या जहाजांना योग्य समन्वय साधल्यास मार्ग दिला जाईल. भारत, चीन आणि काही इतर देशांना या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वीही भारताशी संबंधित काही टँकर्स या मार्गाने गेले होते. “Shivalik”, “Nanda Devi”, “Pine Gas” आणि “Jag Vasant” यांसारखी जहाजे सुरक्षितपणे भारतात पोहोचली आहेत. आता नव्या टँकर्सच्या हालचालीमुळे अडकलेल्या मालाची हळूहळू सुटका होत असल्याचे दिसते. दरम्यान, गुजरातमधील वाडिनार टर्मिनलवर “Jag Vasant” या जहाजाने सुमारे 47,000 मेट्रिक टन एलपीजी पोहोचवली आहे. आणखी जहाजे लवकरच भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.
तथापि, परिस्थिती अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही. होर्मुझ सामुद्रधुनीत अनेक जहाजे अडकलेली आहेत, तसेच जीपीएस जॅमिंग, स्फोटकांचा धोका आणि लष्करी तणाव कायम आहे. त्यामुळे भारत सरकार आणि नौदल सतत सतर्क असून जहाजांना संरक्षण देण्याची तयारी ठेवली आहे. एकूणच, या टँकर्सना मिळालेली परवानगी ही भारतासाठी मोठा दिलासा असला तरी पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे ऊर्जा पुरवठ्यावर अजूनही अनिश्चिततेचे सावट कायम आहे.







