भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठा निर्णय घेत व्याजदरात कपात केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा भार कमी होणार आहे. महागाई दर सातत्याने कमी आणि आर्थिक विकास दरात चांगली वृद्धी होत असल्याने आरबीआयनं व्याजदर घटवल्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेने नवीन व्याजदर जाहीर करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी, रेपो दर ०.२५ ने कमी करण्यात आले आहेत. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठक संपल्यानंतर व्याजदर जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर, नवीन रेपो दर ५.५% वरून ५.२५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. या कपातीमुळे सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. एमपीसीची शेवटची बैठक १ ऑक्टोबर रोजी झाली होती, जेव्हा रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला होता. सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ने हा निर्णय एकमताने मंजूर केला. पुढील एमपीसी बैठक ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होईल.
आरबीआयने संपूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. तो आता ७.३% असण्याची अपेक्षा आहे, जो मागील ६.८% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. ही वाढ पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्थेच्या मजबूत कामगिरीचे आणि विविध क्षेत्रांमध्ये सततच्या वाढीचे प्रतिबिंब आहे.
हेही वाचा..
असीम मुनीर बनले अधिक शक्तिशाली! पाक सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
“२०२६ मध्ये ममता बॅनर्जींना माजी मुख्यमंत्री म्हटले जाईल”
‘इंडिगो’ची ५५० हून अधिक उड्डाणे रद्द! कारण काय?
पंतप्रधान मोदींकडून पुतिन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट!
रिझर्व्ह बँक बँकांना ज्या व्याज दराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो दर कमी केल्याने बँकांना कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते. जेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते तेव्हा ते बहुतेकदा हा फायदा त्यांच्या ग्राहकांना देतात. याचा अर्थ बँका त्यांचे व्याज दर देखील कमी करतात.
