पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील एका लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वर्ग सुरू असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळी झाडून तिची जागीच हत्या केली. त्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान आरोपी विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेत दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, कॉलेज परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी सकाळच्या सुमारास शांतपणे वर्गात आला. त्याच्या खांद्यावर बॅग होती. वर्गात काही विद्यार्थी उपस्थित होते. आरोपीने मृत विद्यार्थिनीशी काही क्षण संवाद साधला. अचानक त्याने बॅगमधून पिस्तूल काढलं आणि विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर ती जागीच कोसळली आणि काही क्षणांत तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
आयबीचे अहवाल पाकिस्तानला पुरवले; हिमंतांच्या निशाण्यावर गौरव की सोनिया?
२०२६-२७ मध्ये भारत जी २० देशांना मागे टाकत होणार नंबर १
एसआयआर प्रक्रियेत अडथळा खपवून घेणार नाही!
भारत-अमेरिका व्यापार कराराने ऑटो पार्ट्स उद्योगाला संजीवनी
गोळीबाराचा आवाज ऐकताच वर्गात गोंधळ उडाला. घाबरलेले विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी वर्गाबाहेर पळाले. काही सेकंदांतच आरोपीने स्वतःकडे पिस्तूल वळवून स्वतःवरही गोळी झाडली. तो गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळला. कॉलेज प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
ही संपूर्ण घटना कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, काही सेकंदांत घडलेला हा थरार पाहून पोलिसही हादरले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी वर्गात प्रवेश करताना, गोळीबार करताना आणि त्यानंतरची धावपळ स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
प्राथमिक तपासात आरोपी आणि मृत विद्यार्थिनी यांच्यात ओळख असल्याची माहिती समोर आली आहे. वैयक्तिक वाद, एकतर्फी त्रास किंवा इतर कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. कॉलेज परिसरात शस्त्र कसं आणलं गेलं, सुरक्षा तपासणी का झाली नाही, यावरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेनंतर कॉलेज परिसरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षणसंस्थांमधील सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.







