दिल्ली ब्लास्ट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ४०.९० लाख लुटले

निवृत्त बँक व्यवस्थापकाला ५४ दिवस ठेवले डिजिटल अरेस्टमध्ये

दिल्ली ब्लास्ट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ४०.९० लाख लुटले

मुंबईतील भांडुप परिसरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भामट्यांनी दिल्ली बॉम्बस्फोट आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून एका निवृत्त बँक व्यवस्थापकाला तब्बल ५४ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडून ४०.९० लाख रुपये उकळले. तक्रार मिळताच मुंबई सायबर सेलने तपास सुरू केला आहे.

पीडित राजेंद्र (महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत व्यवस्थापक पदावरून निवृत्त) यांना १० मार्च रोजी सिग्नल अॅपवर ‘ATS डिपार्टमेंट’ नावाच्या खात्यावरून व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला दिल्ली ATSचा अधिकारी ‘PSI सिंह’ म्हणून ओळख दिली आणि जानेवारीत झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोट आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्याचा दावा केला. भामट्यांनी सांगितले की, त्यांच्या आधार आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करून कर्नाटकमध्ये एक बँक खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये २.६५ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत अटक आणि मालमत्ता जप्तीची धमकी देण्यात आली.

भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांनी पीडिताला घरात स्वतंत्र खोलीत राहण्यास, कोणाशीही बोलू नये आणि सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. मानसिक तणावाखाली पीडिताने सुरुवातीला २.९० लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना शेअर बाजारातील २९ लाख रुपयांची गुंतवणूक विकण्यास भाग पाडले आणि त्यातील २८ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले. यावरच न थांबता भामट्यांनी ‘बेल सिक्युरिटी’च्या नावाखाली आणखी १० लाख रुपये घेतले, जे पीडिताच्या पत्नीने कर्ज काढून दिले. पुढे पैसे मिळताच त्यांनी संपर्क तोडला.

हे ही वाचा:

संदेशखालीमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांचा केंद्रीय दलांसह पोलिसांवर गोळीबार

भाजपच्या विजयानंतर तीस्ता कराराचा लांबलेला प्रश्न सुटणार?

बंगालमधील सरकारी कर्मचारी भयमुक्त; दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

पाकिस्तानच्या पेशावरमधील अमेरिकन वाणिज्य दूतावास होणार बंद

काही दिवस वाट पाहिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने पीडिताला फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी ३ मे रोजी सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवली आणि ४ मे रोजी सायबर सेलमध्ये औपचारिक तक्रार दिली. मुंबई पोलिसांच्या मते, हा प्रकार ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या नव्या सायबर गुन्ह्याच्या धोकादायक ट्रेंडचा प्रकार असून ज्यामध्ये चोरटे सरकारी यंत्रणांचे नाव घेऊन लोकांवर मानसिक दबाव टाकतात आणि मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. सध्या सायबर सेल संबंधित बँक खात्यांची चौकशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Exit mobile version